Raju Shetty
Raju Shetty Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यात नेते व कारखानदारांसाठी लाचारांच्या फौजा तयार झाल्यात

सचिन सातपुते

शेवगाव ( अहमदनगर ) : शेवगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेली जागर एफ.आर.पी.चा व आरधाना शक्तिपिठाची ही यात्रा आज (मंगळवार) आली होती. या मेळाव्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. In Ahmednagar district, an army of helpless people has been formed for the leaders and industrialists

राजू शेट्टी म्हणाले, निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी एका बाजूने अस्मानी तर केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे सुलतानी संकटात सापडला आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवून देखील पीक विमा कंपन्या भरपाई देत नाहीत. सरकारचेही न ऐकण्याचा माज विमा कंपन्यामध्ये येतो कुठून ? असा संतप्त सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.

शेट्टी पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा एकेकाळी चळवळीसाठी प्रसिध्द होता. मात्र तेथे आता नेत्यांसाठी व कारखानदारांसाठी लाचारांच्या फौजा तयार झाल्या आहेत. त्यामुळे आमच्याकडे कोल्हापूर, सांगली भागात उसाला तीन हजार रुपये भाव मिळत असतांना तुमच्याकडे 1700 ते 2100 रुपये असा दर दिला जात आहे. हे तुमच्या असंघटीतपणाचे भोग आहेत. तुम्ही संघटित झाल्याशिवाय कारखानदार तुमच्यापुढे झुकणार नाहीत.

सरकारचा व्यापारी, दलाल, उदयोगपती व कारखानदारांवर वचक नसल्याने ते शेतकऱ्यांना एफ.आर.पी मध्ये वजन काटयात, साखर उताऱ्यात भर दिवसा लुबाडत आहेत. हा दिवसा ढवळया तुमच्या मालावर टाकलेला दरोडा आहे. तो दरोडा यशस्वी होतो कारण त्यामध्ये स्थानिक कार्यकर्ते आणि सरकारचे प्रतिनिधी सामील झाले आहेत. केंद्र सरकारने पूर्वीचा एफ.आर.पी.चे पैसे एकर कमी देण्याचा निर्णय बदलून आता त्याचे तीन तुकडे पाडून कारखानदारांना एक प्रकारे पळवाट दिली आहे.

या भागातील कारखाने कायदा तुमच्या बाजूने असूनही एक वर्षापासून एकरकमी पैसे देवू शकलेले नाहीत. तीन तुकडे करुन तुमच्या पदरात पैसे कधी पडतील याचा विचार करा. रस्त्यावरची तुमची लढाई तुम्हालाच लढावी लागणार आहे. कारण सैन्य कधीही भाडोत्री मिळत नाही. आणि भाडोत्री सैन्य कधी प्रामाणिक राहत नाही, असा सल्लाही शिट्टी यांनी शेतकऱ्यांना दिला.

या मेळाव्याला रविकांत तुपकर, प्रकाश बालवडकर, मयुर गोरे, माजी सभापती दिलीप लांडे, जिल्हाध्यक्ष अंबादास कोरडे, दिलीप बालवडकर, अमर कदम, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे, संतोष म्हस्के, शहराध्यक्ष भाऊ बैरागी, संतोष गायकवाड, मच्छिंद्र आर्ले, संदीप मोटकर, अशोक भोसले, विकास साबळे, अंबादास भागवत आदी प्रमुख उपस्थित होते.

तुपकर म्हणाले की, जो प्रश्न शेतकरी आम्हाला विचारतात तेच प्रश्न कारखानदारांना व व्यापाऱ्यांना विचारण्याचे धाडस दाखवले तर तुम्हाला पडेल त्या किमतीला आणि मिळेल त्या भावाला माल देण्याची वेळ येणार नाही. गावात बसुन राजकीय नेत्यांच्या दिल्ली - मुंबईतील भवितव्याची चिंता करण्यापेक्षा स्वत:च्या ऊस, कापूस, सोयाबीनची चर्चा करा. स्वातंत्र कधीही भिक मागून किंवा फुकट मिळत नसते त्यासाठी लढावे लागते.

शर्वरी देशपांडे हीने शौर्य गीत सादर केले. कार्यक्रामाचे प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी तर तालुकाध्यक्ष प्रशांत भराट यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब फटांगडे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT