Balasaheb Patil
Balasaheb Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बाळासाहेब पाटलांना अजित पवार, वळसे पाटील यांच्या रांगेत बसायचंय....

हेमंत पवार

कऱ्हाड : जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेलच्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अर्ज माघारीच्या दिवशी २१ पैकी दहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. बँकेचे कामकाज चांगल्या प्रकारे सुरू असल्याने गेल्या वर्षीपेक्षा चांगली प्रगती झाली आहे. उर्वरित ११ जागांसाठी निवडणूक लागली असून, जिल्हा बँक ही सेवेचे माध्यम आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी निवडणुकीला सामोरे जात आहे, असे स्पष्ट मत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘माझी सुरुवात सहकारातून झाली. मी पहिल्यांदा सह्याद्री कारखान्याचा संचालक झालो. त्यानंतर मी कारखान्याचा अध्यक्ष म्हणून काम केले. १९९९ मध्ये आमदार झालो. सध्या मला सहकारमंत्री म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संधी दिली. जिल्हा बॅंकेच्या अर्थकारणात सह्याद्री साखर कारखान्याचा मोठा वाटा आहे. त्यामुळे आमच्या काही मागण्या असतात, त्यादृष्टीने मी निवडणुकीकडे पाहात आहे. मी प्रत्येक मतदाराला घरी जाऊन भेटत आहे. सभासद मतदार मोठ्या उत्साहात स्वागत करून तुम्ही जिल्हा बॅंकेत असले पाहिजे, असे सांगत आहेत.

कोल्हापूर जिल्हा बॅंकेत हसन मुश्रीफ, मंत्री बंटी पाटील आहेत, विट्याला अनिल बाबर, मोहनराव कदम, पुण्याला अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, दिलीप मोहिते, रमेश सपकाळ, संग्राम थोपटे, साताऱ्यात रामराजे नाईक-निंबाळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील आहेत, अमरावतीला यशोमती ठाकूर आहेत, सुनील केदार, एकनाथ खडसे आहेत. ही सत्तेसाठी जिल्हा बॅंकेत गेलेली माणसे नाहीत. जिल्हा बॅंक ही सेवेचे माध्यम आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मी निवडणुकीला सामोरे जात आहे.’’

भाजपचा पाठिंबा घेणार का, या प्रश्नावर पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर लढल्या जातात. त्या लढताना काही लोक एकमेकांना सहकार्य करतात. राज्यात अनेक ठिकाणी अनेक पक्षाचे लोक एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जातात. जिल्हा बॅंकेत राजे-महाराजांचा थाट मला दिसून आला नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे मला राज्याच्या सहकामंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे. राज्यातील जिल्हा बॅंका, नागरी बॅंका, पतसंस्था, सोसायट्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी पाहिले की सातारा जिल्हा बॅंकेत एक जरी विषय असला तरी त्याचे सर्व विमोचन केलेले असते. एखाद्या संस्थेला कर्ज द्यायचे असेल तर बॅंकेचे हित नजरेसमोर ठेऊन सर्व माहिती त्यात दिलेली असते. त्यामुळे तेथे थाट कोणाचा नसतो. आम्ही सर्व एक असतो. अधिकारी, कर्मचारी चांगले आहेत. त्यामुळे बॅंकेचे चांगले कामकाज सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT