Shashikant Shinde, Uday Samant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shashikant Shinde: शशिकांत शिंदेंच्या प्रश्नावर मंत्री सामंतांनी स्पष्टच सांगितले; शिरवळला आयटी हब होणार...

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र वाघ

Koregaon news: सातारा येथे 'आयटी हब'साठी आरक्षण केले असल्याचे स्पष्ट करीत शिरवळ येथेही 'आयटी हब' उभारणीसाठी निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत सातारा जिल्ह्यातील जिव्हाळ्याचे रोजगार निर्मिती संदर्भातील प्रश्न उपस्थित केला.

ते म्हणाले, "पुसेगाव, निढळ परिसरात २०१४ पासून एमआयडीसी मंजूर असून, पाणी सुद्धा आरक्षित झाले आहे. सर्वेक्षण होऊन दहा हजार एकर भूसंपादन झाले आहे; परंतु अजून पुढील कार्यवाही नाही. सन २०१३-१४ मध्ये मी लोकप्रतिनिधी असताना औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतला. खटाव तालुक्यातील दुष्काळी भागात औद्योगिक वसाहत निर्माण झाली, तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो,"

सातारा जिल्ह्यात एमआयडीसी विकसित करण्यात येत आहे, त्यामध्ये हा भाग देखील समाविष्ट आहे. सातारा-पुसेगाव रस्त्यालगत ही एमआयडीसी मंजूर आहे; परंतु दुर्दैवाने अजूनपर्यंत या कामाला गती मिळाली नाही, अंतिम प्रक्रिया करून लवकरात लवकर एमआयडीसी स्थापन करावी, अशी लोकांची मागणी आहे.

सातारा येथील महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी बंद पडली आहे. साताऱ्यामध्ये आता डेव्हलपमेंट व्हावी, अशी लोकांची आणि तरुणांची इच्छा आहे. त्यासाठी महाराष्ट्र स्कूटर्सची जागा ताब्यात घेऊन तिथे नवीन इंडस्ट्रीसाठी आपण एखादा नवीन प्रकल्प आणणार का? सातारा येथे आयटी हब निर्माण करणार आहात का, पुण्यापासून जवळ असलेल्या शिरवळला आपण आयटी हब निर्माण करणार का ? असे प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केले.

त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले, "पुसेगाव एमआयडीसीसाठीचे जमीन सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पाण्याच्या आरक्षणाचा निर्णय देखील झाला आहे. आता पुढील कार्यवाहीसाठीही शासन लवकरात लवकर निर्णय घेईल. साताऱ्यामध्ये 'आयटी हब'साठी आरक्षण केले आहे आणि शिरवळमध्ये देखील आयटी हब करण्यासाठीचा निर्णय घेऊ,"

केवळ आयटीहब मंजुरीचा निर्णय न घेता तिथे कंपन्या देखील आणण्याबाबतचे प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा आमदार शिंदे यांनी व्यक्त केली. केसुर्डी परिसरातील पाच-सहा गावांमधील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या; परंतु एमआयडीसीच्या नियमानुसार त्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही, या आमदार शिंदे यांच्या प्रश्नावर यासंदर्भात तपासून निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री सामंत यांनी दिले.

सातारा येथील महाराष्ट्र स्कूटर्स ही कंपनी बंद आहे. यासंदर्भात कायदेशीर बाबी तपासून ही जागा ताब्यात घेण्यासाठी एमआयडीसी प्रयत्न करेल, असे आश्वासन देखील सामंत यांनी दिले.

त्याचबरोबर आपण उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांबाबत संबंधितांची बैठक आपल्यासमवेत घेऊन कार्यवाही करू, असेही सामंत यांनी सांगितले. नेर गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शिक्के उठवले नाहीत, असे आमदार शिंदे यांनी निदर्शनास आणून देताच, यासंदर्भात आदेश दिले असून त्याबाबतही लवकरच कार्यवाही होईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT