Narendra Patil
Narendra Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : शरद पवारांना 'जाणता राजा' पदवी दिली जाते, ते कुठे लढायला गेले होते... नरेंद्र पाटील

सरकारनामा ब्युरो

सातारा : शरद पवार यांना जाणता राजा ही पदवी दिली जाते. मात्र, ते कुठे लढायला गेले होते, अशी खोचक टीका करत कार्यकर्त्यांनीही नेत्यांना पदवी देताना शब्दांचा योग्य वापर करावा, असे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुणीही अवमानकारक भाष्य करणे अयोग्य आहे. शिवछत्रपती हे देशाचे आराध्य दैवत असून, कुठल्याही महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह बोलणे चुकीचे आहे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

नरेंद्र पाटील म्हणाले,‘‘अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळात काही प्रमाणात समन्वय कमी असल्याने व्याज परताव्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता व्याज परताव्याची प्रकरणे निकालात काढून ती शून्य टक्यांवर आणली जाणार आहेत. महामंडळाची जबाबदारी २०१८ पासून माझ्याकडे आली असून, या कालावधित तीन हजार ५०० कोटींचे कर्जवाटप व ५० हजार लाभार्थी जोडले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील तीन हजार २०० लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतील बहुतांश लाभार्थी परतावा करत असल्याने विविध बँका स्वागत करत आहेत.

दरम्यान, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या सारथी योजनेतही सकारात्मक बदल घडविण्यात येणार आहेत. आर्थिक महामंडळाच्या योजनेतून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज देण्यासाठी विचार सुरु असून, याबाबत बैठकही झाली आहे. याचबरोबर महामंडळाच्या योजनेतील अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा समन्वयकांची संख्या वाढविण्यात येणार असून येत्या काही वर्षात एक लाख मराठा उद्योजक तयार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शंभूराज देसाईंना जाब विचारणार

गेल्या आठवड्यात कर्हाड येथे झालेल्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन पत्रिकेत माझे नाव होते. मात्र, प्रतापगडावर झालेल्या शिवप्रतापदिनाच्या कार्यक्रम पत्रिकेतून माझे नाव वगळण्यात आले. मी जिल्ह्याचा भुमिपूत्र व राज्यपातळीवरील एका पदावर कार्यरत असल्याने पत्रिकेत नाव टाकावे, अशी अपेक्षा होती. मात्र, या प्रकाराचा जाब पालकमंत्री शंभुराज देसाई व जिल्हाधिकार्यांना पत्र देऊन विचारणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

लाभार्थी संवाद मेळावा

आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेतून ज्या लाभार्थ्यांनी कर्ज घेऊन व्यवसाय उभारले आहेत, असे लाभार्थी व बँक अधिकार्यांशी तीन डिसेंबरला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सकाळी ९ ते ३ या वेळेत हा मेळावा होणार असून, याद्वारे योजनेचा प्रसार व जनजागृती मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT