Jaykumar Gore, Prabhakar Deshmukh
Jaykumar Gore, Prabhakar Deshmukh sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच जिहे कटापूर योजना रखडवली... आमदार गोरेंचा घाणाघात

Umesh Bambare-Patil

सातारा : माण, खटाव तालुक्यातील 32 गावांसाठी वरदान ठरणारी जिहे कठापूर पाणी योजना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केवळ राजकारणासाठी रखडवली आहे. ही योजना माण खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची अस्मिता असून ती लांबविण्याचे पाप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करू नये. त्यासंदर्भातील निविदा काढण्याची कार्यवाही तात्काळ करावी, असा निर्वाणीचा इशारा भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांनी दिला आहे. दरम्यान, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी कृपया माण, खटावच्या पाणी प्रश्नात राजकारण आणू नये. आयुक्त दर्जाचे अधिकाऱ्याची उंची असणारे राजकारण करावे, असा सल्ला त्यांनी दिला.

आमदार गोरे यांनी जिहे कटापूर व टेंभू योजनेवरून राष्ट्रवादी नेत्यांवर सडेतोड टीका केली. जिहे-कठापूर योजनेचे शेवटच्या काही मीटरचे ब्लास्टिंग बाकी आहे. ते झाले की आंधळी धरणात पाणी सोडले जाईल. तेथून पाणी उचलून ते माण तालुक्यातील ३२ गावांना शेती व पिण्यासाठी दिले जाणार आहे. या पाणी योजनेसंदर्भात माझ्यावर अनेक आरोप झाले. ज्यांची माझ्यावर बोलायची राजकीय उंची नाही त्यांनी हे आरोप केले.

माण तालुक्यात पाणी आणल्यामुळे आज येथे चार-चार साखर कारखाने सुरू असून ऊस शिल्लक राहात आहे. ही स्वप्नवत कामगिरी या पाणी योजनेमुळे करणे शक्य झाले आहे. जिहे कठापूर योजनेची निविदा एक महिन्यात काढतो असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेच्या दरम्यान दिले होते. मात्र, त्यावर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन प्रसिद्ध केलेली निविदा रद्द करायला लावली.

याचे करते करवते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख असून त्यांनी कृपया माण, खटावच्या पाणी प्रश्नात राजकारण आणू नये. आयुक्त दर्जाचे अधिकाऱ्याची उंची असणारे राजकारण त्यांनी करावे. टेंभू योजनेतून 32 गावांना अडीच टीएमसी पाणी उचलून देण्याचा प्रस्ताव 2019 मध्ये मीच दिला होता. विखळे येथे पाणी परिषद झाल्यानंतर माझ्याच पत्रावर तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी फेरवाटपाचे आदेश दिले.

ज्यांनी नुकताच कृतज्ञता समारोह घेतला त्यांनी या योजनेच्या संदर्भात किमान एक ओळीचे पत्र तरी लिहिले होत का, असा प्रश्न करून मला विविध गुन्ह्यात अडकविण्यासाठी जी शक्ती वापरली, तीच शक्ती शेतकऱ्यांच्या पाणी योजनेसाठी वापरली असती तर बरे झाले असते, असा टोला त्यांनी प्रभाकर देशमुख यांना लगावला. पीएमजेवाय च्या माध्यमातून केंद्र शासनाने लक्ष्मणराव इनामदार पाणी योजनेसाठी 247 कोटी रुपये मंजूर केले.

मात्र, या योजनेचे जलपूजन होऊ नये याकरता अनेक अडथळे आणण्यात आले. जर तुम्हाला मोदींचा निधी चालतो, मग ते जलपूजन कार्यक्रमासाठी का चालत नाहीत, असा प्रश्न गोरे यांनी केला. जिहे-कठापूर च्या निविदा रखडवून ठेवण्याचे पाप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले आहे ही योजना माण खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांची अस्मिता आहे ही योजना लांबविण्याचे पाप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करू नये त्यासंदर्भातील निविदा काढण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. यासंदर्भात राज्य शासनाकडे दाद मागून प्रसंगी उपोषण करण्याचा इशाराही आमदार गोरे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT