Jayant Patil, Chandrashekhar Bawankule Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News : ...तर तुमच्यावर पंतप्रधान कोण ? अशी म्हणायची वेळ आली नसती; जनाधारावरून जयंत पाटलांचा बावनकुळेंना टोला

Chandrakant Bawankule Taunts Sharad Pawar : आमदार गेले म्हणून पक्ष त्यांच्या पाठीमागून जात नाही

Rahul Gadkar

Kolhapur Political News : 'राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पक्ष राहिलेला नाही,' असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळेंनी केला होता. याची परतफेड प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बावनकुळेंना सडेतोड उत्तर देऊन केली आहे. 'आमदार गेले म्हणून जनाधार गेला असे होत नाही. असा समजण्याचा गैरसमजही करू नये. तसे असते तर तुम्हाला दारोदारी फिरून पंतप्रधान कोण असावा? हे सांगण्याची वेळ आली नसती, असा टोला पाटलांनी बावनकुळेंना लगावला. (Latest Political News)

शरद पवार (Sharad Pawar) यांची बाजू भक्कमच आहे, त्यात शंका घेण्याचे काय आहे ? दुसरी बाजू त्यांच्या मताप्रमाणे दावा करणारच, मात्र पक्ष पक्षाच्या ठिकाणी आहे. आमदार गेले म्हणून पक्ष त्यांच्या पाठीमागून जात नाही, असं सुप्रीम कोर्टानेच शिवसेनेबाबतीत भाष्य केले आहे. देशातील पदाधिकाऱ्यांनी अॅफिडेव्हिट करून दिलेला आहे. ज्यामध्ये शरद पवार यांनाच अध्यक्ष म्हणून मान्यता दिली आहे, असे स्पष्टीकरण पाटलांनी दिले.

'लोकसभा निवडणुकीबाबत अद्याप आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे 'इंडिया'मध्ये सहभागी झाले आहेत,' असे पाटील यांनी सांगितले, तर मलिकांबाबत त्यांनी सावध भूमिका घेतली. 'नवाब मलिक यांना बाहेर बोलण्यास कोर्टाने मज्जाव केलेला आहे. त्यामुळे ते कुठेही बोलले नाहीत. नवाब मलिक अजित पवार गटासोबत जात आहेत, असे प्रसारमाध्यमांमधूनच ऐकले,' असे पाटलांनी या वेळी सांगितले. (Maharashtra Political News)

नांदेड घटनेला सरकारच जबाबदार

नांदेड रुग्णालयातील घटनेला राज्यकर्तेच जबाबदार असल्याचा घणाघातही पाटलांनी केला. ते म्हणाले, औषध खरेदी करण्याचा निर्णय मंत्र्यांनी घेतला, तोच या गोष्टीला कारणीभूत आहे. नाहीतर नांदेडची घटना घडलीच नसती. आमच्या सरकारच्या काळात विकेंद्रित खरेदी करण्याची व्यवस्था होती. या सरकारमध्ये मात्र संबंधित मंत्र्यांनी स्वतःकडे अधिकार घेतलेले आहेत. महत्त्वाचे निर्णय योग्य वेळेस झालेले नसतील, औषधांचा तुटवडा संपूर्ण महाराष्ट्रात जाणवला असेल. त्यामुळे नांदेडच्या घटनेस मंत्रीच यास जबाबदार आहेत, असा आरोप (Jayant Patil) जयंत पाटलांनी केला.

पवारांमुळे नेतृत्व करण्याची संधी

शरद पवारांच्या २५ वर्षांच्या नेतृत्वामुळे आम्हा सर्वांना सत्तेत बसण्याची संधी मिळालेली आहे. गेली १७ ते १८ वर्षे सगळेजण जवळपास हे मंत्री राहिलेले आहेत. त्यावेळी शरद पवारसाहेबांची कृती त्यांना अडचणीची वाटली नाही. आज त्यांची अडचण निर्माण झाली म्हणून सगळा दोष शरद पवारांना देऊन त्यांचा पक्ष काढून घेण्याचा जो प्रकार आहे, तो भारतातील जनता मान्य करेल असे वाटत नाही, असेही जयंत पाटलांनी सांगितले.

पटोलेंच्या यादीवर पक्षश्रेष्ठी विचार करतील

महाविकास आघाडीतील निवडणूक समन्वय समितीसाठी निवडलेल्या नावांवर काँग्रेसच्या वरीष्ठांनी आक्षेप घेतला. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, 'नाना पटोले यांनी दिलेल्या यादीमध्ये एखाद्याचे नाव पुढे मागे होऊ शकते. त्यात विशेष बाब काही नाही. पटोलेंच्या यादीवर पक्षश्रेष्ठीसुद्धा विचार करतील.'

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT