MLA Jaykumar Gore
MLA Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khatav : खटावचा दुष्‍काळाचा कलंक पुसण्‍यासाठी झटतोय... जयकुमार गोरे

सरकारनामा ब्युरो

पुसेसावळी : कायम दुष्काळी म्हणून खटाव तालुक्‍यातील गावांचा उल्लेख होत आला आहे. मात्र, गेल्या बारा वर्षांपासून हा कलंक पुसण्यासाठी अहोरात्र झटत आहे. जिथे पिण्याला पाणी मिळत नव्हते, त्या भागात आज हजारो एकर ऊस उभा आहे, हीच आपल्या कामाची पोचपावती असून, यापुढे खटाव तालुक्‍यांतील गावांना दुष्काळी म्हणायची कोणाची हिम्मत होणार नाही, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माण, खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.

खटाव तालुक्यातील येळीव, कळंबी, त्रिमली, लांडेवाडी या गावांतील विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. या वेळी कऱ्हाड उत्तरचे नेते, वर्धनचे अध्‍यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारी संचालक व पुसेसावळी गटाचे नेते विक्रमशील कदम, माजी समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, भाजपचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, आदी उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, पुसेसावळीसह आठ गावांची योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न करूया. आम्ही गावोगावचा विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहोत. या भागाचे आणि माझे नाते वेगळे आहे, विकासकामांचा डोंगर यापूर्वी उभा केला आहे आणि येथून पुढे विकासाची गंगा वाहतच राहिल.

धैर्यशील कदम म्हणाले, आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची टाकी, अंतर्गत रस्ते, पाइपलाइन, स्मशानभूमी अशी कोट्यवधी रुपयांची कामे या भागात झाली आहेत. विक्रमशील कदम म्हणाले, पुसेसावळी गटाला जिल्ह्यात रोल मॉडेल बनविण्याचा माझा मानस आहे. गट-तट विसरून काम करणाऱ्याच्या पाठीशी उभे राहा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT