Satyajeet Kadam and Jayashree Jadhav News, kolhapur pot nivadnuk, Kolhapur by election 2022 result
Satyajeet Kadam and Jayashree Jadhav News, kolhapur pot nivadnuk, Kolhapur by election 2022 result Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर उत्तर : जयश्री जाधव यांचा मोठा विजय; भाजपला नाकारले

ऋषीकेश नळगुणे

कोल्हापूर : मागच्या अनेक दिवसांपासून राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर (Kolhapur North Poll Bye Election) पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या (Congress) उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (Jayshree Jadhav) यांनी तब्बल १८ हजार ९०१ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला आहे. या पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ मत मिळाली तर भाजपचे (BJP) पराभूत उमेदवार सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांना ७७ हजार ४२६ मत मिळाली. त्यामुळे कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला भाजपचा करेक्ट कार्यक्रम करण्यात यश आले आहे. (Kolhapur north assembly by election News Updates, Kolhapur pot nivadnuk)

सतेज पाटील यांनी जयश्री जाधव यांच्या पहिल्या प्रचारसभेत बोलताना ही निवडणूक म्हणजे ‘आण्णांच्या माघारी, आता आपली जबाबदारी’ असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ही टॅगलाईन खरी करत महाविकास आघाडीने एकत्रित येत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा मोठा पराभव केला आहे. निकालानंतर विजयी उमेदवार जाधव यांचे अभिनंदन करण्यात येत असून समर्थक व कार्यकर्त्‍यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आताषबाजी करत एकच जल्लोष केला.

जयश्री जाधव यांनी या विजयाचे संपूर्ण श्रेय सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि कोल्हापुरच्या सर्व जनतेला दिले आहे. त्या या विजयाबद्दल बोलताना म्हणाल्या, गट-तट बाजूला ठेवून महाविकास आघाडी एकत्र आल्याचा मला जास्त आनंद आहे. माझ्या या विजयाचं संपूर्ण श्रेय महाविकास आघाडीसोबतच सतेज पाटील, हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर आणि कोल्हापूरच्या जनतेला आहे. निवडणुकीत भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी मोठं मनदाखवायला हवं होतं, पण त्यांनी दाखवलं नाही. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी असून, आण्णांच्या माघारी त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. त्यामुळं आण्णांनी जे पेरलं, ते खरंच चांगलं उगवलंय.

या निवडणुकीसाठी मंगळवारी (१२ एप्रिल) चुरशीने जवळपास ६१ टक्के मतदान झाले होते. एकूण २ लाख ९१ हजार ९७८ मतदारांपैकी एक लाख ७८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतांची आज या राजाराम तलाव परिसरातील शासकीय गोदामात मोजणी करण्यात आली. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली होती. २६ टेबलांवरती २६ फेऱ्यांत ३५७ केंद्रावरील मतमोजणी करण्यात आली. यात अगदी पोस्टल मतांच्या फेरीपासूनच जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती. ती त्यांनी अखेरच्या फेरीपर्यंत कायम ठेवली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT