Kolhapur News, 04 Oct : टोलची पावती फाडणे, कसबा बावड्यातील पाण्याच्या टाकीचे राजकारण, सत्तासंघर्षात दक्षिण मतदारसंघाचे केलेले नुकसान, हद्दवाढीबाबत अबोला, शक्तीपीठ महामार्गाला विरोध या पद्धतीने विकासकामांना बगल देवून शहराचे नुकसान करण्याचे काम महापालिकेत सत्ता भोगणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी वर्षोनुवर्षे केले आहे.
पण आता जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. त्यांनी सात नाही आठ कलर द्यावेत, पण या निवडणुकीत महानगरपालिकेवर महायुतीचा भगवाच फडकलेला दिसेल. याची कुणकुण लागल्यानेच बहुतेक आमदार सतेज पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा टोला राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी लगावला आहे.
महानगरपालिकेत सत्ता उपभोगून जनतेच्या हितासाठी अकार्यक्षम ठरणारे आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळाचे कायदे मला शिकवू नयेत. जनतेच्या प्रश्नासाठी अधिकाऱ्यांवर हक्कभंग करणार म्हंटल्यावर माजी पालकमंत्र्यांना अधिकाऱ्यांना की ठेकेदारांना महानगरपालिकेचे जावई म्हंटल्याचा पुळका आला आहे काय?
अशी विचारणा करत आमदार सतेज पाटील यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी शहरवासीयांच्या माथी मारलेल्या गळक्या थेट पाईपलाईन योजनेच्या कामाच्या चौकशीची मागणी विधीमंडळात करावी, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले. निवडणुकीत रस्त्यांची वर्क ऑर्डर झाली नाही असा खोटा अपप्रचार करणारे आमदार सतेज पाटील तोंडघशी पडले.
रस्त्यांच्या कामात दिरंगाई, दर्जा याबाबतच अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त केला गेला. पण, अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदाराचा पुळका त्यांना आला आहे. ज्या पद्धतीने निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा केली जाते त्याच पद्धतीने शंभर कोटींचे रस्ते करून घेण्याची धमक आमच्यात आहे.
त्याची काळजी माजी पालकमंत्री महोदयांनी करू नये. त्यापेक्षा येणाऱ्या दिवाळीत तरी थेट पाईपलाईनने व्यवस्थित अभ्यंगस्नान होईल का? याकडे लक्ष द्यावे. प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला सूचनांचे पालन करणे बंधनकारक असते. सूचनांचे उल्लंघन करणे हे नियमबाह्य आहे. अधिकाऱ्याची नैतिक जबाबदारी असते की तो जनतेच्या हितासाठी आणि कायदेशीर मार्गाने काम करेल.
सूचनांचे पालन न करता किंवा राजकीय दबावाखाली काम करून जनहित डावलणे, हे पदाचा गैरवापर आहे. हक्कभंग हा लोकप्रतिनिधींचा अधिकार आहे. एकदा अधिकारी दिलेल्या सूचनांचे पालन न करता किंवा राजकीय दबावापोटी जनहिताच्या कामांत टाळाटाळ करत असेल तर त्यांच्यावर हक्कभंग दाखल करता येतो.
येणाऱ्या अधिवेशनात जनहिताच्या कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर हक्कभंग प्रस्ताव दाखल केलाच जाईल. वास्तविक खासदार शाहू छत्रपती यांनी दिलेल्या सूचनाही अधिकारी डावलतात असे आमदार पाटील मान्य करतात मग अशाच अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिल्यास पाटील यांना अधिकाऱ्यांचा पुळका का आला? असा टोला क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.