Nana Patole
Nana Patole sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

थोडे दिवस जाऊ द्यात...मुख्यमंत्र्यांचे डोक ठिकाणावर येईल...नाना पटोले

Umesh Bambare-Patil

सोलापूर : थोडे दिवस जाऊ द्यात, मग त्यांना कळेल. मुख्यमंत्र्यांचे डोकं ठिकाणावर येईल, निवडणुकीला अजून खूप वेळ आहे. मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

भाजपसोबत जाऊन आम्ही आगामी निवडणुकीत दोनशे आमदार निवडून आणून ताकद दाखवू अन्यथा आम्ही शेतात जाऊन काम करू, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. या दाव्यावरून श्री पटोले यांनी त्यांच्यावर टीका केली. नाना पटोले म्हणाले, थोडे दिवस जाऊ द्यात, मग त्यांना कळेल. ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचे डोक ठिकाणावर येईल.

सध्या अपुरा पाऊस, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, शेतीचे नुकसान या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. निवडणुकीला अजून खूप वेळ आहे. याविषयावर आताच चर्चा करायला वेळ नाही. मुख्यमंत्र्यांनी सध्याच्या परिस्थितीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शिवसेनेच्या आमदारांचे हे बंड नसून हा उठाव आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणत असून त्यातून महाविकास आघाडीला आव्हान देण्याचा प्रयत्न होतोय का, यावर श्री. पटोले म्हणाले, हा शिवसेनेतील अंतर्गत प्रश्न आहे. त्याविषयी बोलावे असे काही नाही. हे राजकिय नाट्य झाले आहे.

अग्निपथ सारखी चुकीची योजना काढून तरूणांना व देशाच्या सुरक्षेला धोका पोचवण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारने केला. हे सर्व दाबण्यासाठी महाराष्ट्रात हा भूकंप निर्माण केला. त्यामध्ये ते यशस्वी झाले आहेत. त्यातून महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. सध्या गोवाहटीला पूरपरिस्थिती असून तेथे लोकांना अन्न नाही. तेथे महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी ठेवले होते. त्यांनी तेथे काय वक्तव्ये केली ही सर्वांना माहिती आहेत.

ही एक प्रकारची महाराष्ट्राची बदनामी आहे. आपला महाराष्ट्र हा पांडुरंगाचा महाराष्ट्र असून एक श्रध्देची भावना वारकऱ्यांची असते. अशी महान परंपरा लाभलेल्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचा अधिकार यांना दिलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्याचे शिवसेना-भाजपचे सरकार सहा महिन्यात कोसळेल, असे वारंवार बोलले जात आहे. याविषयी ते म्हणाले, सहा महिने नव्हे वर्षभर तरी लागेल. हे सरकार जास्त दिवस चालणार नाही.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आरक्षण काढण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. याबाबत काँग्रेसची भूमिका काय राहणार असे विचारले असता श्री. पटोले म्हणाले, ओबीसी आरक्षणासह निवडणूका होणे गरजेचे होते. अन्यथा या निवडणूका होऊ नयेत अशी आमची भूमिका होती. ही भूमिका आम्ही आघाडी सरकारपुढे मांडली होती. मुख्यमंत्र्यांच्या पुढचा माईक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिसकावून घेतल्याचा प्रकार घडला आहे, या प्रकाराकडे तुम्ही असे पाहता, यावर ते म्हणाले, आता तरीही सुरवात आहे. आणखी पुढे पहा काय काय होतंय ते. त्यामुळेच हे सरकार फार काळ टिकणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT