गेल्या साडेचार वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मोकळा झाला आहे. पुढच्या चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घ्या, असे आदेश राज्य सरकारला दिल्यानंतर राजकीय नेत्यांची धावपळ वाढली आहे. येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या निवडणुकी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीनंतर अपयशाने खचून गेलेली महाविकास आघाडी कोल्हापूर जिल्ह्यात कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेली आहे. जिल्ह्यातील महायुती ऑन टाइम रिचेबल असल्याचे चित्र आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सदस्य नोंदणीला महत्व दिले जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अद्याप तरी शांतता आहे. पुढील चार महिने निवडणूक निश्चित झाल्यास महाविकास आघाडीमध्ये चलबिचल यानिमित्ताने जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे.
भाजपकडून कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सदस्य नोंदणीला महत्त्व दिले. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला जवळपास साडेचार ते पाच लाखापर्यंत नवी सदस्य नोंदणी पार पडली. तर शिंदेंच्या शिवसेना आणि महायुती मधील राष्ट्रवादीने देखील सदस्य नोंदणी करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रणशिंग फुंकले. मात्र महाविकास आघाडीचे चित्र पाहता विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशामुळे अजूनही निरउत्साह पाहायला मिळत आहे.
महायुतीकडून आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दोन वेळा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तीन वेळा, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तीन वेळा दौरा पार पडला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील उत्साह कायम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी मधील काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र अजूनही या निवडणुकीबाबत ताळमेळ नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढवण्याचा निर्णय माहितीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र महाविकास आघाडीतील कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र हे वरिष्ठ नेत्यांवरच अवलंबून आहे. ठाकरे यांची शिवसेना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वतंत्र लढण्यावर ठाम आहेत.
आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर विमानतळावर आले असता केवळ कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, अशा सूचना दिल्या आहेत. काँग्रेसकडून अद्याप कोणत्याही हालचाली नाहीत. तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मातोश्रीचा आदेश महत्त्वाचा आहे. तिन्ही पक्षीय पातळीकडून सध्यातरी महाविकास आघाडीच्या गोठात कोणतीच हालचाल दिसत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.