chandrakant patil
chandrakant patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

छापेमारीमुळे काही मोठी नावे अडचणीत आल्यानेच ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : राज्यात गेल्या आठवड्यात सात ठिकाणी छापे पडले आहेत. याही आठवड्यात पाच ठिकाणी छापे पडले आहेत. त्यातून काही मोठी नावे अडचणीत आली आहेत. राज्यातील जनतेचे लक्ष यावरून वळवण्यासाठीच महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. महाविकास आघाडीला शेतकऱ्यांबद्दल कोणतेही प्रेम नाही, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. (Maharashtra bandh called to divert attention from income tax raids : Chandrakant Patil)

चंद्रकांत पाटील यांची आज कोल्हापुरात पत्रकार परिषद झाली. त्यात बोलत असताना त्यांनी वरील आरोप केला. प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, ‘उत्तरप्रदेशातील लखीमपूर खीरी येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांच्या अंगावर जी गाडी गेली, त्यामध्ये केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा असल्याचा आरोप आहे. तक्रारीवरून त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई होईल. मात्र, या घटनेशी महाराष्ट्राचा काय संबंध. पण महाविकास आघाडी सरकारने राज्य बंद करण्याचे आवाहन केले.

कायदा व सुव्यवस्था नीट ठेवण्याचे काम सत्ताधाऱ्यांचे असते. मात्र, सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच हातात दंडुके घेऊन दुकाने बंद करण्यासाठी भाग पाडत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने शिवसेना स्टाईलने बंद करा, असे सांगितले. कारण, बंद करण्यासाठी त्यांच्याकडे माणसेच नाहीत, असा दावाही चंद्रकांतदादांनी केला.

राज्यात गेल्या आठवड्यात सात ठिकाणी छापे पडले आहेत. याही आठवड्यात पाच ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे, यामुळे राज्यातील काही मोठी नावे अडचणीत आली आहेत. जनतेचे या छापेमारीवरून लक्ष इतरत्र वळवण्यासाठीच महाराष्ट्र बंद करण्यात आला आहे. राज्यात गेल्या दोन वर्षांत मोठी वादळे आली. महापूर आला. पण, राज्य सरकार शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसान भरपाई देऊ शकलेले नाही. यांना शेकऱ्यांबद्दल खरंच प्रेम असेल, तर गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उसाला एकरक्कमी एफआरपी जाहीर करावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.

त्यावेळी महाराष्ट्र बंद करावासा वाटला नाही का?

आघाडी सरकार असताना मावळमध्ये शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. शरद पवार मुख्यमंत्री असताना नागपूर अधिवेशनात गोवारी समाजाच्या मोर्चावर लाठीमार झाला. त्यावेळी झालेल्या गोंधळात ११४ लोक चेंगरून मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी पवारांना महाराष्ट्र बंद करावासा वाटला नाही. या शेतकऱ्यांचा तर तत्कालीन सरकारमुळे मृत्यू आला, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT