Pune News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सातत्याने सुरू आहे. मात्र, या बदल्यांवरून आता प्रशासकीय वर्तुळात आणि राजकीय क्षेत्रात मोठी चर्चा रंगू लागली आहे. कारण गृह विभागाने नुकत्याच केलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अवघ्या पाच दिवसांत मोठा 'युटर्न' घेतल्याचे समोर आले आहे.
यामध्ये सर्वात जास्त चर्चा रंगतेय ती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार बापू पठारे यांचे जावई आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अमोल झेंडे यांच्या बदलीची. झेंडे यांनी अवघ्या ५ दिवसांत आपली बदली रद्द करून पुण्यातच राहण्यासाठी 'फिल्डिंग' लावण्यात यश मिळवले असल्याचे बोलले जात आहे.
गृह विभागाने २१ मे २०२६ रोजी अमोल झेंडे यांची बदली मिरा-भाईंदर, वसई-विरार (MBVV) पोलीस आयुक्तालयात केली होती. मात्र, अवघ्या पाच दिवसांत गृह विभागाने आपला निर्णय बदलला असून झेंडे यांची मिरा-भाईंदर येथील बदली रद्द करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती पुन्हा पुण्यातच 'पीएमआरडीए' (PMRDA) येथे करण्यात आली आहे.
अमोल झेंडे यांच्या या अवघ्या पाच दिवसांतील 'बॅक टू पुणे' प्रवासावरून आता राजकीय वर्तुळात त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. झेंडे यांच्या बदली रद्द होण्यामागे त्यांच्या कुटुंबाचे असलेले तगडे राजकीय वजन कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
झेंडे यांचे सासरे बापू पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत, तर त्यांचे मेव्हणे आणि भावजय पुणे महानगरपालिकेत भाजपचे माजी नगरसेवक आहेत. तसेच अमोल झेंडे यांच्या पत्नी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत. या सर्वपक्षीय वरदहस्तामुळेच झेंडे यांनी आपली बदली रद्द करण्यात यश आलं का? याबाबत चर्चा सुरू आहेत.
अमोल झेंडे यांच्यासह गृह विभागाने आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये फेरबदल केले आहेत. ठाण्यात पोलीस उपायुक्त (DCP) पदावर कार्यरत असलेल्या अमरसिंह जाधव यांची नवी मुंबईला बदली करण्यात आली होती. मात्र, गृह विभागाच्या ताज्या आदेशानुसार त्यांचीही बदली रद्द करण्यात आली असून, त्यांना पुन्हा ठाण्यातच पोलीस उपायुक्तपदी कायम ठेवण्यात आले आहे.
तर दुसरीकडे, नवी मुंबईत पोलीस उपायुक्त (वायरलेस कोस्टल डिव्हीजन) पदावर कार्यरत असलेल्या निलेश सोनावणे यांची ठाणे येथे महामार्ग सुरक्षा पथक (HSP) पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. याच अंतर्गत इतरही काही महत्त्वाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये महिला अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
रुपाली अंबुरे यांची पोलीस अधीक्षक (डायल-११२) नवी मुंबई येथे, तर स्वाती भोर यांची प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, सांगली येथे बदली करण्यात आली आहे. कविता नेरकर यांची समादेशक, राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्र. १४, छत्रपती संभाजीनगर येथे तर वैशाली माने यांची पोलीस उपायुक्त (DCP), मिरा-भाईंदर, वसई-विरार येथे नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संदीप पालवे यांची पोलीस अधीक्षक, लोहमार्ग (रेल्वे), छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे.
राज्यात पोलीस प्रशासनात गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेला हा बदल्यांचा खेळ आणि त्यातही अवघ्या ५ दिवसांत फिरवले जाणारे आदेश गृह विभागाच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.