Makrand Patil
Makrand Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

खंडाळा कारखाना बारामतीच्या घशात घालण्याचा विरोधकांचा अपप्रचार....

रमेश धायगुडे

लोणंद : उस गेला नाही, बीलं मिळाली नाहीत, साखर मिळाली नाही, अशा तक्रारी खंडाळ्यातील शेतकरी सातत्याने माझ्याकडे करत होते. लोकप्रतिनिधी या नात्यांने त्यांच्या तक्रारींची दखल घेण्याची माझी जबाबदारी आहे. त्यामुळेच मी खंडाळा कारखान्यात लक्ष घातले आहे. बारामतीच्या घशात हा कारखाना घालण्याचा प्रचार केला जातोय. मात्र, विरोधच करायचा असता तर गेल्या वर्षी ३२ कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळाल्यावर किसन वीर भुईंज कारखाना डिसेंबरमध्ये सुरु झाला. त्यावेळीच हे पैसे मिळून दिले नसते, अशी सडेतोड टीका आमदार मकरंद पाटील यांनी केली आहे.

खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी काल (ता. १२) पारगांव येथे मयूर मंगल कार्यालयात आमदार मकरंद पाटील व व्ही. जी. पवार यांच्या नेतृत्वाखालील 'शेतकरी विकास परिवर्तन पॅनेल' च्या उमेदवारांच्या प्रचारा निमित झालेल्या जाहीर प्रचार सभेत आमदार श्री. पाटील बोलत होते.

यावेळी खंडाळा साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष व ज्ञानदिप परिवाराचे संस्थापक व्ही. जी. पवार, ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे खंडाळा तालुका अध्यक्ष दत्तानाना ढमाळ, जिल्हा काँग्रेसचे चंद्रकांत ढमाळ, नितीन भरगुडे - पाटील, मनोज पवार, अॅड. श्यामराव गाढवे, खंडाळा पंचायत समितीचे सभापती राजेंद्र तांबे, उपसभापती वंदनाताई धायगुडे - पाटील, एस. वाय. पवार, रमेश धायगुडे - पाटील, डॉ. नितिन सावंत, हणमंतराव साळुंखे उपस्थित होते.

आमदार श्री. पाटील म्हणाले, खंडाळ्यात साखर कारखाना उभा केला हे कोणी नाकारत नाही. मात्र, तो येथील शेतकऱ्यांच्या पैशावर उभा राहिला आहे. कोणी खिशातील पैसा घालून उभा केलेला नाही. कारखाना उभा राहूनही विद्यमान संचालक मंडळाला तो पूर्ण क्षमतेने चालवता आला नाही. ते काहीच करू शकले नाहीत. उलट कारखाना उभा करण्यासाठी जेवढा खर्च आला त्यापेक्षा अधिक पटीने कारखान्याच्या मानगुटीवर कर्जाचा बोजा करून ठेवला आहे.

आज खंडाळा कारखान्यावर २५० कोटींचे कर्ज आहे. खंडाळा कारखान्याचे विद्यमान अध्यक्षांचा वडिलधारी व माझ्या वडिलांचे मित्र म्हणून आदर आहे. आमच्याकडून अनादर होणार नाही, ती आमची संस्कृतीही नाही. मला या कारखान्याचे अध्यक्ष व्हायचे नाही. उस गेला नाही, बीलं मिळाली नाहीत, साखर मिळाली नाही. येथील शेतकरी सातत्याने माझ्याकडे तशा तक्रारी करत होते. लोकप्रतिनिधी या नात्यांने त्यांच्या तक्रारींची दखल घेण्याची माझी जबाबदारी आहे. त्यामुळेच मी कारखान्याकडे लक्ष घातले आहे.

बारामतीच्या घशात हा कारखाना घालण्याचा प्रचार विरोधकांकडून केला जातोय. मात्र, विरोधच करायचा असता तर गेल्या वर्षी ३२ कोटी रुपये राज्य सरकारकडून मिळाल्यावर किसन वीर भुईंज कारखाना डिसेंबरमध्ये सुरु झाला. त्यावेळीच हे पैसे मिळून दिले नसते. मात्र, शेतकऱ्यांसाठी गप्प बसलो. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती दमडीही पडली नाही, हे पैसे गेले कुठे हा प्रश्न आहे. किसन वीर, खंडाळा व प्रतापगड मिळून एक हजार १५ कोटींचे कर्ज आहे. त्यामध्ये किसन वीर वर ७५० कोटी तर खंडाळ्यावर २५० कोटीचे कर्ज आहे.

कामगारांचे पगार, हजारो शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. असे सांगून आमदार श्री. पाटील म्हणाले, हा कारखाना खाजगी कारखानदाराच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. वार्षिक आवहालात ६० कोटीची अनामत ठेव रक्कम आली कोठून असा प्रश्न पडला. त्यावेळी ती ठेव एका खाजगी उद्योगपतीने ठेवल्याचे समोर आले. चोऱ्या हे करणार अन्‌ बोटे आमच्याकडे दाखवणार. या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. व्ही.जी. पवार व जिजाबा पवार यांचे खंडाळ्याचा कारखाना उभारणीसाठी मोठे योगदान आहे. भविष्यात हा कारखाना सुरळीत चाललेला दिसेल, चांगल दरही मिळेल, असे सांगून आमदार श्री. पाटील यांनी 'शेतकरी विकास परिवर्तन पॅनलला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवहानही केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT