Ramdas Kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ramdas Kadam : 'मातोश्री' आता बाळासाहेबांचा राहिला नसून काँग्रेस, राष्ट्रवादीचा... - रामदास कदमांचा टोला!

राजेंद्र त्रिमुखे

Ramdas Kadam Vs Uddhav Thackeray : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला (काल) दादरच्या स्मृतीस्थळावर शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा झाला. या राड्याची तणावपूर्ण छटा आज स्मृतिदिनी दिसून येत असून, शिवतीर्थावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला आहे.

या पार्श्वभूमीवर शिर्डीत साईबाबा समाधी दर्शनासाठी आलेले शिंदे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. बाळासाहेबांची मातोश्री आता काँग्रेस-राष्ट्रवादीची झाल्याचा घणाघात कदम यांनी या वेळी उद्धव ठाकरेंवर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

''हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर मातोश्रीवर राहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर संघर्ष केला. ज्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाण्याची वेळ येईल, त्या दिवशी शिवसेना मी बंद करेल असेही बाळासाहेब ठाकरेंनी म्हटले होते. मात्र त्यांच्या मुलाने राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर जात बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता मातोश्रीही बाळासाहेब ठाकरे यांचा राहिला नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झाला आहे,'' अशी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर शिर्डीत केली.

तसचे, ''भाजपने जरी मात्रोश्री बाळासाहेबांचं स्मारक करा, अशी मागणी केली असेल तरी ती मातोश्री बाळासाहेबांचं स्मारक होऊ शकत नाही.'', असेही मत यावेळी रामदास कदम यांनी व्यक्त केले आहे.

बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गोंधळ घालणाऱ्या गद्दारांना प्रतिकार हा केवळ ट्रेलर होता, 2024 ला पिक्चर दाखवणार असे संजय राऊतांनी म्हटलंय. त्यावर बोलताना रामदास कदम यांनी ''संजय राऊत हा महाराष्ट्रातील शकुणी मामा आहे. त्याचं बोलण कोणी गांभीर्याने घेत नाही, मीही त्याला महत्त्व देत नाही. आज त्याचं नाव घेणंसुद्धा उचित ठरणार नाही.'' असं रामदास कदम या वेळी म्हणाले. तर, गजानन कीर्तिकरांसोबतचा वाद संपला आहे त्यावर काही बोलणार नाही, अस सांगत कीर्तिकरांवर बोलणे या वेळी कदम यांनी टाळलं.

साईबाबांकडे काय प्रार्थना केली? -

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतलं. साईबाबांच्या दर्शनानंतर मंदिर परिसरात माध्यमांशी बोलतांना कदम म्हणाले की, ''साईबाबांकडे मराठा समाजाला लवकर आणि टिकणारे आरक्षण मिळु दे ही प्रार्थना केली आहे. एखादा समाज मागास असेल तर अपवादात्मक परिस्थितीत पन्नास टक्क्यांच्यावर आरक्षण देता येईल, अस सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

त्यामुळे मीही सरकारला मराठा समाज मागास असल्याचे तातडीने सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. या संदर्भातील रिपोर्ट सुप्रीम कोर्टात सादर केल्यास ओबीसी आणि मराठा सुरू असलेला वाद थांबेल आणि पन्नास टक्क्यांपेक्षा आधिक आरक्षण देता येईल.'' अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केली असल्याच कदम म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT