Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अजित पवारांनी जैन समाजाला दिला ‘हा’ शब्द!

सरकारनामा ब्यूरो

सांगली : शंभराव्या अधिवेशनाच्या निमित्ताने जैन समाजाला (Jain community) शब्द देतो की, विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या जुलै महिन्यात आहे. त्या अगोदर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात जैन समाजाच्या प्रश्नांवर समाजातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत मंत्रालयात एक बैठक घेण्यात येईल. जैन समाजासाठी जे जे करणे शक्य आहे, ते सर्व करण्यासाठी मी यत्किंचितही कमी पडणार नाही. असा शब्द मी तुम्हा सर्वांना देतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. (Meeting will be held soon in Ministry on the issue of Jain community : Ajit Pawar)

दक्षिण भारत जैन समाजाचे शंभरावे अधिवेशन सांगलीत (Sangli) आयोजित करण्यात आले होते. त्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. भारतातील कोणत्याही राज्यात जैन समाजाला मिळणाऱ्या सुविधा या आपल्या राज्यात देण्यासाठी आम्ही मागेपुढे बघणार नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले की, जैन समाजाच्या मागण्यांवर मंत्रिमंडळातील माझे सहकारी सहजगत्या सांगत होते, की हे सर्व करून टाकू. ते देऊन टाकू, त्याला काही अडचण नाही. पण, शेवट माझ्याकडं आलेला आहे. या संदर्भात मी एवढंच सांगतो की, आपल्याला जे देणे शक्य आहे, ते देण्याचा प्रयत्न करावा. त्यामध्ये जातीपातीचा, नात्यागोत्याचा विचार करायचा नसतो. त्यामध्ये माणुसकीचा विचार करायचा असतो, अशी शिकवण आम्हाला शरद पवारसाहेबांनी दिली आहे. आज या अधिवेशनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आलेल नसले तरी महाविकास आघाडी म्हणून काम करत असताना जयंत पाटील, मी, विश्वजित कदम, सतेज पाटील, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ आम्ही सर्वांनी जैन समाजाचे मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. ते सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू.

आज देशात आणि राज्यात जाती-जाती आणि धर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम काहीजण करत आहेत. प्रत्येक धर्माने एकमेकांचा आदर, सन्मान करण्याची शिकवण दिलेली आहे. ही आपली परंपरा आणि संस्कृती आहे, ती आपण जोपासली पाहिजे. काहीजण स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी समाजात अंतर वाढविण्याचे काम करत आहेत. काही अडचणी असतील, तर चर्चेच्या माध्यमातून त्या अडचणी सोडविता येतात. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल अहोरात्र प्रयत्न करत आहेत. पण, काहीतरी भावनिक आणि धार्मिक मुद्दा काढून तेढ निर्माण करणे, आपल्याला परवडणारे नाही. सरकारं येतील आणि सरकारं जातील. पण, समाज एकसंघ ठेवण्याची भावना असायला हवी, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले की, अलीकडच्या काळात तरुणांमध्ये वाचनाची सवय कमी होत आहे. तरुणांच्या हातात मोबाईल आला आहे. थोडकेच माहिती मिळाली पाहिजे, समाज काळानुसार बदलत आहे. म्ही सत्तेवर आलो, तेव्हा दोन लाखापर्यंतचे शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ केले. वेळेवर परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते. कोरोनाच्या काळात ते आमलात आणता आले नाही. पण आता त्याची यादी मागवून ते देण्याचा प्रयत्न करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT