Sarpanch missing
Sarpanch missing Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरातून आणखी एक महिला सरपंच गायब; पण पोलिसांच्या सतर्कतेने ४८ तासांत सापडल्या

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : बार्शी (Barshi) तालुक्यातील सौंदरे गावच्या सरपंच (Sarpanch) चार-पाच दिवसांपूर्वी अचानक गायब झाल्या होत्या. जिल्हा पोलिसांनी (police) त्याची माहिती मिळताच यंत्रणाला तातडीने कामाला लागली आणि अवघ्या ४८ तासांत त्या महिला सरपंचास शोधून काढले. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील आश्रमातून त्यांना पोलिसांनी आणून सुखरूप कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्यांच्या गायब होण्याचे कारण मात्र कळू शकले नाही. एकीकडे सरपंच बाईंना शोधण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले. पण, २० दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या कवठे (ता. उत्तर सोलापूर) गावच्या सरपंच भाभींना शहर पोलिस शोधू शकले नाहीत, हे वास्तव आहे. (Missing female sarpanch of Solapur district was found within 48 hours)

याबाबतची हकीकत अशी, सौंदरे गावच्या सरपंच अचानक गावातून बेपत्ता झाल्या. गावातील काही लोकांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी गाव सोडल्याची बातमी वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली. त्याबाबतची माहिती समजताच सोलापूर जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावली. त्या सरपंच महिलेचा फोटो आणि वर्णन महाराष्ट्रातील सर्व पोलिस ठाण्यात पोचविण्यात आले. तसेच, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चौकशी सुरु केली.

सोशल मीडियातून आलेली माहिती पाहून रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथील आश्रमात आश्रयाला थांबलेल्या सरपंच महिलेची माहिती तेथील काहींनी दापोली पोलिसांना दिली. त्यांनी संबंधित वर्णनाची महिला आश्रमात असल्याचे सांगितले. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली आणि त्या सौंदरे गावच्या सरपंच असल्याचे स्पष्ट झाले. दापोली पोलिसांनी सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून त्यांना सुखरूप गावी आणले. ही सर्व प्रक्रिया पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत पूर्ण केली.

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांचे ट्विट

सौंदरे गावच्या महिला सरपंच गावातील काही लोकांच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता झाल्याची वार्ता सर्वत्र पसरली. गावातील काहींनी त्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनाही दिली. त्यांनी तत्काळ ट्विट करत गावातील कोणत्या स्थानिक लोकांचा त्यांना त्रास होता, याची माहिती घेऊन संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे फर्मान पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना सोडले. पण, सरपंच बाईंनी तशी कोणतीही फिर्याद न दिल्याने त्यांच्या गायब होण्याचे गूढ कायम आहे.

राजकारणात येऊ पाहणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचे काय?

सोलापूर जिल्ह्यातील दोन महिला सरपंच एक महिन्यात बेपत्ता होण्याचे उदाहरण एकमेव असेल. कवठे गावच्या सरपंचभाभी ७ सप्टेंबरला भरदुपारी बेपत्ता झाल्या. त्यांना शोधण्यात अद्याप शहर पोलिसांना यश आलेले नाही. दुसरीकडे ग्रामीण पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या सतर्कतेमुळे सौंदरे गावच्या सरंपच महिला ४८ तासांत सापडल्या. पण, दोन महिला सरपंच बेपत्ता झाल्याने राजकारणात येऊन गावचा कारभार हाकणाऱ्या महिला सरपंचच असुरक्षित असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT