Ravindra Chavan, Mahadev Jankar and Pravin Darekar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Monsoon Session 2023 : म्हसवडच्या विश्रामगृहात चक्क गुरं आणि शेळ्या, तर मुंबईत रिकामटेकड्यांचा वावर !

सरकारनामा ब्यूरो

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 : महाराष्ट्रातील शासकीय विश्रामगृहांची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. तेथे गरजूंपेक्षा रिकामटेकड्यांचाच वावर अधिक आहे. सातारा जिल्ह्यातील म्हसवडच्या विश्रामगृहात तर चक्क गुरं आणि बकऱ्या बांधल्या जातात, हा गंभीर प्रकार विधान परिषदेत आज आमदार महादेव जानकर यांनी उघडकीस आणला. (Cattle and goats are kept in the rest house)

आमदार जानकर म्हणाले, सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र आहे. येथील विश्रामगृह जीर्ण झाले आहे. म्हसवड नगरपालिका क्षेत्रातील विश्रामगृहात तर चक्क शेळ्या आणि गुरं बाधली जातात. मी स्वतः सात वेळा यासंदर्भात पत्र दिले. पण अधिकारी म्हणतो, माणसंच नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा कारभार असाच चालणार आहे का, असा सवाल त्यांनी केला.

भाई गिरकर यांनी हा प्रश्‍न आज (ता. २५) सभागृहात उपस्थित केला होता. ते म्हणाले, विश्रामगृहांचा वापर गरजूंपेक्षा रिकामटेकडे जास्त करतात. अवस्था इतकी खराब आहे की, लोकप्रतिनिधी, अधिकारी तेथे जायला बघत नाही. आरक्षणाशिवाय खोल्या दिल्या जातात. पण यावर कुणाचे नियंत्रण नाही.

विश्रामगृहांप्रमाणेच देवस्थानातील स्वच्छतागृह घाणेरडी असतात. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. हा प्रश्‍न अतिशय महत्वाचा असल्याने गुरूवारी किंवा शुक्रवारी एक तासाची चर्चा ठेवण्यात येईल, असे उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

दरम्यान प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) सांगितले की, विश्रामगृहांच्या बाबतीत कोकणावर अन्याय झालेला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील (Maharashtra) विश्रामगृह सुस्थितीत आहेत. कारण तेथील लोकप्रतिनिधी मंत्री झाले की, ते आपल्या परिसराची काळजी घेतात. सर्व व्यवस्था करवून घेतात. पण कोकणातील विश्रामगृहांची स्थिती सुधारलेली नाही. पोलादपूरचे विश्रामगृह, आंबेगडी आणि प्रतापगडच्या पायथ्याशी असलेले विश्रामगृह खंडर झालेले आहे. त्यामुळे सरकारने या संदर्भात कोकणाचा आढावा घ्यावा.

कर्मचारी निवृत्त झाल्यामुळे ही अवस्था..

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, जेव्हा विश्रामगृह बनवले तेव्हाच्या व आत्ताच्या परिस्थितीत तफावत आहे. विश्रामगृहांमध्ये पूर्वी राहण्याची व्यवस्था, खानसामाची व्यवस्था होती. जसा जसा कालावधी होत गेला. तसतसे कर्मचारी निवृत्त झाले. पदे रिक्त झाली. सद्यःस्थितीत ६१२ विश्रामगृह चांगल्या स्थितीत आहेत. १०० पेक्षा जास्त विश्रामगृह जीर्ण बंद अवस्थेमध्ये आहे. या सर्व ठिकाणी दुरुस्तीची कामे करण्यात येतील.

मुंबईत (Mumbai) तीन ठिकाणी विश्रामगृह आहेत. दोन चांगल्या स्थितीत आहेत. चर्चगेट आणि वरळी-विसावा चांगली आहेत. कलानगरच्या विश्रामगृहात वर्दळ होती. त्यामुळे तेथे दुरुस्तीची कामे झाली नाहीत. पण ऑक्टोबर २०२३च्या आधी त्याचे काम पूर्ण होईल. कारण लोकप्रतिनिधींची मागणी आहे. यापुढे सर्व विश्रामगृहांत ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करता येते का, हे तपासून बघितले जात आहे. पुढच्या अधिवेशनाच्या आधी अॅप विकसित करण्यात येईल, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी सभागृहाला दिली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT