सातारा : खटाव आणि माण या कायम दुष्काळी तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी या योजनेचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करावा किंवा नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकासनिधी अंतर्गत नवीन मालिका २७ मध्ये समावेश करुन लागणारा सर्व निधी मिळावा, अशी मागणी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी आज जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे केली. लवकरच याबाबत निर्णय घेऊन जिहे कठापूर योजना पूर्ण करू, असे आश्वासन मंत्री शेखावत यांनी दिले.
खासदार रणजितसिंह निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी आज केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची दिल्ली येथे मंत्र्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी त्यांनी जिहे कठापूर योजनेबाबत चर्चा करून विविध मागण्याही केल्या. आमदार जयकुमार गोरे म्हणाले, जिहे कठापूर उपसा सिंचन योजना लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मी गेल्या १२ वर्षांपासून सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. या योजनेच्या वाढीव खर्चाला दोन वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे काम राज्यातील मागील भाजपा सरकारने केले होते.
आजपर्यंत या योजनेसाठी ६१७ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. महिनाभरात अंशत: योजना कार्यान्वित करुन नेर धरण आणि येरळा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेची उर्वरित कामे करण्यासाठी आणखी ६४२ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. लागणारा हा निधी त्वरित मिळण्यासाठी जिहे कठापूर उपसा सिंचनचा समावेश प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत करावा. त्यासाठी जलशक्ती मंत्रालयाने मान्यता दिली आहे. आता या प्रस्तावाला केंद्र शासनाकडून मान्यता मिळावी अशी मागणी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे केली.
दिल्ली येथे मंत्र्यांच्या दालनात याविषयीचे निवेदन देताना जिहेकठापूर योजना लवकर पूर्ण होणे माण आणि खटाव तालुक्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याचे त्यांना सांगितले. या योजनेसाठी नाबार्डमधून यापूर्वी ६५ कोटींचे अर्थसाहाय्य प्राप्त झाले होते. आता लागणारे ६४७ कोटी नाबार्ड ग्रामीण पायाभूत विकासनिधीतून मिळावेत अशी मागणीही मंत्र्यांकडे केली. केंद्र शासनाकडून जिहे कठापूरसाठी लागणारा उर्वरित निधी प्राप्त झाल्यावर नेर उपसा सिंचन एक आणि दोन तसेच आंधळी बोगद्यातून पाणी माणमधील आंधळी धरण आणि माण नदीत सोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
आंधळी धरणातून पाणी उचलून उत्तर माणमधील गावांची तहान भागविणारी आंधळी उपसा सिंचन योजना तसेच योजनेच्या दुसऱ्या उर्ध्वगामी नलिकेची कामे वितरण व्यवस्थेसह पूर्ण होणार आहेत. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी जिहे कठापूर योजनेची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी लागणारा ६४७ कोटींचा निधी लवकरच देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.