sujay vikhe
sujay vikhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विखे म्हणाले, हसन मुश्रीफ हे बॅलन्स शिट व अकाऊंट बुक तपासून नगरला येतील...

Amit Awari

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, पारनेर, शेवगाव, राहुरी आदी तालुक्यांसह अनेक ठिकाणी मागील दीड महिन्यांत अतिवृष्टी झाली होती. मागील दोन महिन्यांत अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ अहमदनगर जिल्ह्यात आले नाहीत. या संदर्भात उपस्थित पत्रकारांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी मुश्रीफ येत नसल्याचे जे कारण सांगितले ते सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. MP Vikhe said, Hasan Mushrif will come to Ahmednagar after checking balance sheet and count book...

जिल्हा प्रशासनाने या अतिवृष्टीचे पंचनामे देखील केले. मात्र शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तातडीची आर्थिक मदत मिळण्यासाठी अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे. हे आंदोलन अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील जिल्हा भूजलसर्वेक्षण कार्यालयासमोर सुरू आहे. तेथे खासदार विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या संदर्भात खासदार विखे म्हणाले, पालकमंत्री हसन मुश्रीफ हे त्यांचे बॅलेंसशिट व काऊंट बुक पाहत आहे. किती पैसे आले. किती पैसे गेले याचा हिशोब ते जुळवत आहेत. त्यासाठी त्यांना वेळ लागत असल्याने ते अहमदनगर जिल्यात येत नाहीत. लवकरच ते जिल्ह्यात येतील अशी अपेक्षा आहे, असा टोलाही खासदार विखे यांनी लगावला.

जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी 61 व आज 21 गावे लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यावर खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आज पुन्हा 21 गावे लॉकलाऊन झाल्याने खासदार विखे पाटील यांनी जिल्हा प्रशासनावर टीका केली. ते म्हणाले, लॉकडाऊनचा निर्णय हा पूर्णतः चुकीचा आहे. अनेक वेळा यावर वाद-विवाद झालेले आहेत. यावर अनेक वेळा प्रशासनाला निवेदनेही दिलेली आहेत. जिल्हा प्रशासनाने कोरोना लसीकरणावर भर दिला पाहिजे. गावांतील सर्वांचे लसीकरण कसे होईल या दृष्टिकोणातून प्रयत्न केला पाहिजे. ज्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना लॉकडाऊनची अवश्यकता नाही. जिल्हाधिकाऱ्यांना कायद्याचे संरक्षण एवढे जास्त आहे की त्यांच्या पुढे कोणी काही करू शकत नाही. लॉकडाऊन करून प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी लसीकरणावर भर देणे गरजेचे आहे, असा सल्लाही डॉ. विखे पाटील यांनी दिला.

उद्या दसऱ्याच्या मुहूर्तावर खर्डा येथे होणाऱ्या आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतील स्वराज्य ध्वज कार्यक्रमावरही खासदार डॉ. विखे पाटील यांनी नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, दसऱ्या निमित्त काही लोकप्रतिनिधी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. ते भाषणांत सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करण्याचे व गर्दी न जाण्याचे आवाहन करतात. पण अशा पद्धतीने पक्षपातीपणा आढळू येतो. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय निपक्षपातीपणे राहून काम केले पाहिजे ही त्यांच्याकडून अपेक्षा आहे. पण ज्या पद्धतीने जिल्ह्याचा कारभार चालला आहे. त्यानुसार महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधीच्या प्रत्येक कृतीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

ते कोविड काळात कोविडचा प्रसार करणे असोत. कोरोना काळात त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. कोरोना संकट कुणामुळे वाढले हे सर्व जनतेला माहिती आहे. तरीही या लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याचे धाडस जिल्हाधिकारी दाखवू शकले नाहीत. त्या प्रमाणे उद्याही तसेच होणार आहे. दसऱ्या निमित्त काही तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी कार्यक्रम ठेवले आहेत. तिथे कितीही गर्दी झाली तरी मी लिहून देतो जिल्हाधिकारी त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवू शकत नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT