पुण्यात भाजप आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर गोरक्षकांकडून हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने राजकारण तापले आहे.
राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी या प्रकरणी बोगस गोरक्षकांविरोधात कारवाईची मागणी केली.
शिवप्रतिष्ठानच्या टीकेला उत्तर देताना नायकवडी यांनी जातीयवादी हल्ले स्वीकारले जाणार नाहीत, जो टीका करेल त्यांचा हिशेब केला जाईल, असा इशारा दिला.
Sangli News : भाजप आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर पुण्यात काही गोरक्षकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांच्या ड्रायव्हरला धकाबुकी झाली होती. या हल्ल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी, या हल्ल्याचा निषेध करताना, गोरक्षणाच्या नावाखाली बोगस गोरक्षकांची दडपशाही सुरू असून काहींचा हा व्यवसाय सुरू असल्याचा दावा केला होता. तसेच अशा बोगस गोरक्षकांची दडपशाही शासनाने मोडून काढावी, अशी मागणी केली होती. या मागणीवरून आता नवा वाद सुरू झाला असून या वादात शिवप्रतिष्ठानने उडी घेतला होती. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौगुले यांनी खोत आणि नायकवडी यांच्यावर टीका केली होती. त्यास आता नायकवडी यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी, आपण अल्पसंख्याक आमदार असल्यानेच अशा पद्धतीने जातीयवादी टीका केली जातेय. पण आपण कुणाच्याही धमकीला घाबरत नाही. जो टीका करेल त्यांचा हिशेब केला जाईल, असा इशारा दिला आहे.
यावेळी नायकवडी यांनी, आतापर्यंत एकदाही आपण गोवंश हत्येचे समर्थन केलेले नाही आणि करणारही नाही. पण बेकायदेशीरपणे होत असलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोधच असेल. तरीही मी शेतकऱ्यांची बाजू मांडली म्हणून जातीयवादी समजून माझ्यावर आरोप केले जात आहेत. अल्पसंख्याक आमदार असल्यानेच काहीजणांकडून असे आरोप आणि टीका केली जातेय, असाही दावा आमदार नायकवडी केला आहे.
नायकवडी म्हणाले, गोवंश हत्येला माझा कायमच विरोध आहे. हिंदुत्वालाही विरोध नाही मात्र, हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात व्देष पसरविणाऱ्यांना आपला विरोध असेल. जनावरे घेऊन जाणारी वाहने अडविण्याचा आणि त्याच्या तपासणीचा कोणलाही अधिकार या बोगस गोरक्षकांना नाही. वाहनांना थांबवे, तपासणी करणे आणि कारवाईचे अधिकार पोलिसांना आहेत. तरीही काही संस्था, व्यक्ती बेकादेशीरपणे अशी कामे करत आहेत. त्यामुळे अशा बनावट गोरक्षकांवर कारवाईसाठी मी पोलिसांकडे तक्रार केलीय.
शेतकरी नियमांचे पालन करून जनावरांची वाहतूक करत असतील, तर त्यांची अडवणूक कोणीही करू नये. मात्र, काहीजणांकडून कायदा हातात घेऊन असे प्रकार केले जातायेत. त्यालाच आपला विरोध असल्याचेही नायकवडी म्हणाले.
...हिशेब केला जाईल
यावेळी नायकवडी यांनी, शिवप्रतिष्ठानच्यावतीने आपल्याला धमक्या दिल्या जात असून आपण या धमक्यांना कधीच घाबरत नसल्याचे सांगितले आहे. तसेच होणाऱ्या टीकेचा हिशेब केला जाईल. यामुळे टीका करणाऱ्यांनी पन्नासवेळा विचार करूनच टीका करावी, असा इशाराही दिलाय.
नेमकी काय केलीय टीका?
आमदार सदाभाऊ खोत यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आमदार इद्रिस नायकवडी यांनी बोगस गोरक्षकांवर जोरदार टीका करत कारवाईची मागणी केली होती. तसेच अशा बोगस गोरक्षकांनी धंदा सुरू केल्याचा दावा केला होता. ज्यानंतर शिवप्रतिष्ठानच्यावतीने नायकवडी यांच्यावर आरोप आणि टीका करण्यात आली होती. शिवप्रतिष्ठानने आमदार खोत आणि नायकवडी यांनी गायींची कत्तल करणाऱ्यांची सुपारी घेतली असून ते गोरक्षकांवर खालच्या पातळीवर टीका करत असल्याचा आरोप केला होता. तसेच अशा पद्धतीने गोवंशाचे रक्षण करणाऱ्या प्रामाणिक गोरक्षकांवर टीका अथवा आरोप केल्यास ते सहन करणार नाही, असाही इशारा शिवप्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.