Maharashtra Politics  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

NCP Split : राष्ट्रवादीतील अस्थिरता, काँग्रेसचा सावध पवित्रा : ऐनवेळी वेगळा निर्णय घेतला तर..

संभाजी थोरात

Kolhapur : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दीड महिन्यापासून अस्थिर वातावरण आहे. अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर महाविकास आघाडीबरोबर राहिलेल्या राष्ट्रवादीबाबतही मित्र पक्षामध्ये अविश्वासाचं वातावरण आहे. यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपासोबत घेण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेत काही बदल झाल्यास ऐनवेळी काही अडचण नको म्हणून राज्यातील काँग्रेस सावध भूमिकेत आहे. सर्वच मतदारसंघात पक्ष संघटना बळकट करण्यासाठी काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते बाहेर पडले आहेत.

राज्यात 2019 पासून राजकीय अस्थिरतेचे वातावरण आहे. कोण कधी कोणत्या पक्षाबरोबर जाईल याची खात्री देण कठीण झाले आहे. जून 2022 च्या एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर हा अविश्वास आणखी वाढला. त्यातच अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्या विरोधात जाऊन सत्तेत सहभाग घेतला.

आता लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. भाजपाने राज्यात लोकसभेला जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी कुणाशीही जुळवून घ्यायला तयार आहे. भाजपाला विरोध करण्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी देश पातळीवर इंडिया आघाडी काढली. भाजपाचा विजयी रथ रोखण्यासाठी कॉग्रेसही आक्रमक झाली आहे. मात्र आता राज्यातील महाविकास आघाडीतला महत्वाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्थिर वातावरण आहे.

अजित पवार यांनी पाडलेली फुट मोठी असली तरी शरद पवार 'इंडिया' आघाडीत असणे सुध्दा मनोबल वाढवणार होत, मात्र शरद पवार आणि अजित पवार यांच्या होत असलेल्या भेटी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला शरद पवारांची उपस्थिती, यामुळे कुठंतरी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये अविश्वास निर्माण होऊ लागला आहे. शरद पवार यांनी ऐनवेळी काही वेगळा निर्णय घेतला तर राज्यात उमेदवारी निवडीपासून यंत्रणा उभी करण्यातसुध्दा अडचणी होऊ शकतात. त्यामुळे भाजपला प्रभावी विरोध करणे कठीण होईल. त्यामुळे आता काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी सावध पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

कॉग्रेस आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच्या आघाडीनंतर राज्यातील अनेक मतदारसंघात काँग्रेसचे पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष झाले होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या अनेक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघात काँग्रेस लक्ष घालत नव्हतं तिथं आता कॉग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यातील सर्वच नेते वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे करून बैठका करत आहेत. अनेक नेते भाजपाच्या विरोधात आक्रमक बोलत आहेत. त्यामुळे राज्यातील कॉग्रेस सावध झाली आहे, हे स्पष्ट आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT