Rajendra Phalke, NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिर्डीत होणार प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अभ्यास शिबिर

सरकारनामा ब्युरो

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना पक्षाची धैय्य धोरणे कळावीत. या उद्देशाने महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने `राष्‍ट्रवादी मंथन ः वेध भविष्याचा` या अभ्यास शिबिराचे आयोजन केले आहे. शिर्डी ( ता. राहाता ) येथे ४ व ५ नोव्हेंबरला हे शिबिर होणार आहे, अशी माहिती राष्‍ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके ( Rajendra Phalke ) यांनी राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

त्यांनी सांगितले की, या शिबिरात ज्येष्ठ नेते शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकारी, कार्यकत्यांचे वर्तमान स्थितीसंदर्भातील आकलन वाढावे, भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे आणि राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी भक्कम व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन केले आहे. जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीला ताकद देणारा अहमदनगर जिल्हा आहे. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींचे जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे.

पक्षातर्फे सभासद नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. ही मोहीम गतिमान करण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन २३ वर्षे झाली असून येत्या जून महिन्यामध्ये पक्ष रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा प्रमाण मानून राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल दमदारपणे सुरू राहिली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यासाठी चांदा ते बांदा पर्यंत परिवार संवाद यात्रा काढून तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पक्षाचा विचार पोहोचवला. याचे परिणाम नंतरच्या काळात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून आले. नगरपंचायत निवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर राहिला. अलीकडे ग्रामपंचायत निवडणुकीतही पक्षाने लक्षाणीय यश मिळवले. जनतेच्या अशा पाठबळामुळेच आजवरच्या २३ वर्षांच्या प्रवासातील साडेसतरा वर्षे पक्ष राज्याच्या सत्तेमध्ये राहिला. शरद पवार यांनी सातत्याने केलेली विचारांची पेरणी आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केलेली मशागत यामुळे प्रत्येक आघाडीवर पक्षाने अग्रभागी राहून आपली भूमिका बजावली.

समविचारी पक्षांना सोबत घेऊन वैचारिक लढाई लढली. हीच परंपरा अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी शिर्डी येथे 'राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा' या अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज देशापुढे आणि राज्य पुढे अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सामोरे जाताना कार्यकत्यांची मनोभूमिका अधिक बळकट होण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना दहशतीखाली ठेवण्यात येत आहे. केंद्रीय यंत्रणाच्या मदतीने अडीच वर्षे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न झाले. केंद्रीय यंत्रणांची दहशत वापरूनच फोडाफोडी करून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT