Solapur, 12 September : महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. संघाचे विद्यमान सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवीणकुमार तथा बाळासाहेब नाहाटा यांच्याविरोधात तब्बल १४ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या ठरावावर निर्णय घेण्यासाठी येत्या २१ सप्टेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पणन संचालक संजय कदम यांनी याबाबतची नोटीस काढली असून, या बैठकीत नाहाटा यांचे सभापतिपद टिकणार की जाणार, याकडे सहकार आणि राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे महत्त्व आहे. त्यामुळे संघाच्या नेतृत्वात होणारा संभाव्य बदल केवळ सहकार क्षेत्रापुरता मर्यादित न राहता राज्यातील बाजार समित्यांच्या राजकारणावरही परिणाम करणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संघाच्या २१ संचालकांपैकी १४ संचालकांनी अविश्वास ठरावावर स्वाक्षऱ्या केल्याने नाहाटा यांची स्थिती सध्या अडचणीत असल्याचे चित्र आहे. नाहाटा यांच्या कार्यपद्धतीबाबत संचालकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा असून, या नाराजीचे रूपांतर आता अविश्वास ठरावात झाल्याचे बोलले जात आहे.
आहेर यांचे नाव आघाडीवर?
नाहाटा यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेत भाजपचे हिंगोलीचे अंकुशराव आहेर यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे अविश्वास ठराव मंजूर झाल्यास संघाच्या पुढील सभापतिपदासाठी आहेर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
मात्र, सभापतिपदाची निवड ही केवळ अविश्वास ठरावापुरती मर्यादित राहणार नसून त्यामागे व्यापक राजकीय समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे आहेर यांना सभापतीपद मिळणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
जगताप, मानकर, डक, दळवींची भूमिका महत्त्वाची
बाजार समिती संघाच्या संचालक मंडळात करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप, गोंदियाचे माजी आमदार केशवराव मानकर, मुंबई मार्केट कमिटीचे माजी सभापती अशोकराव डक आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांसारख्या अनुभवी नेत्यांचा समावेश आहे, त्यामुळे पुढील सभापती निवडीत या संचालकांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच पणनमंत्री जयकुमार रावल आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
राज्य बाजार समिती सहकारी संघाच्या कामकाजावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजकीय प्रभाव होता. त्यामुळे अजितदादांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे बाळासाहेब नाहाटा यांच्याकडे बाजार समिती संघाच्या अध्यक्षपदाचा धुरा दिली होती. मात्र, सध्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर संघाच्या नेतृत्वासाठी नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू असल्याचे चित्र आहे.
येत्या २१ सप्टेंबरच्या बैठकीत अविश्वास ठरावाचे भवितव्य स्पष्ट होणार असून, त्यानंतर बाजार समिती संघाच्या सभापतिपदासाठी कोणाचे नाव पुढे येते, याकडे राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.