kolhapur Shivsainik Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Belgaum Black Day : मुख्यमंत्र्यांच्या मोठं बोलण्याला ठाकरे बाणा पडला भारी...

Rahul Gadkar

रद्दkolhapur News : बेळगाव काळा दिनच्या (ता. १ नोव्हेंबर) पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाची भूमिका अप्रत्यक्षपणे सर्वासमोर आली आहे. चार दिवसांपूर्वी रात्रीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर ‘आम्हीही बेळगावला जाऊ’ अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, ही प्रतिक्रिया रात्रीच्या अंधारातच गुडूप झाली. शिंदे गटाचा एकही प्रतिनिधी बेळगावला न गेल्याने सीमा भागातील मराठी बांधव संतप्त आहेत. पण, मुख्यमंत्र्यांच्या या मोठं बोलण्याला ठाकरे गटाचा बाणा भारी पडला आहे. शिंदे गटाचा एकही प्रतिनिधी बेळगावला गेला नसला, तरी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सीमेवर धडक मारली. (Not a single leader of Shinde group was present at the Belgaum Black Day event)

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढ्यासाठी चौथ्या पिढीने वाहून घेतले आहे. या चळवळीत अनेक हुतात्मे झाले. त्यानंतरही ६७ वर्षांपासून महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमा भागातील मराठी भाषिकांनी हा लढा जिवंत ठेवला आहे. यापूर्वीही शिवसेनेने प्रत्येक काळा दिन संस्मरणीय बनवला आहे. कोणी सोंग घेऊन, तर कोणी ड्रायव्हर बनून बेळगावमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे सीमा भागात मराठी माणूस आजही महाराष्ट्राकडे आशेने पाहत आहे. मात्र, यंदा ठाकरे गट सोडला तर शिंदे गटाचा एकही प्रतिनिधी बेळगावकडे फिरकला नाही. (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बेळगाव कारवार, निपाणी सीमा भाग हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या स्वाभिमान, अस्मितेचा विषय. ज्या तळमळीने सीमा भागामधील मराठी माणूस लढतो आहे. तशी धगधग महाराष्ट्रात दिसणे गरजेचे होते. परंतु, निषेधाच्या दिवशीही पाठ फिरविणे म्हणजे मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

एकेकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागात आंदोलनं केली आहेत. सीमावासीयांच्या भावना जाणून घेऊन त्यांनीही लढा दिला आहे. सीमालढ्यापायी त्यांनी कर्नाटकातील कारागृहाची हवासुद्धा खाल्ली असल्याचा दावा ते करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चार दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते, त्यावेळी त्यांनी ‘आमचेही प्रतिनिधी बेळगावला पाठवू,’ अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, त्यांना या गोष्टीचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.

सीमा समन्वयक मंत्री गायब

राज्याचे तीन मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर हे सीमा समन्वयक मंत्री आहेत. त्यांच्या जोडीला खासदार धैर्यशील माने हेही आहेत. बुधवारी यांच्यापैकी एकानेही सीमा भागापर्यंत धडक दिलेली नाही. शिवाय त्याबद्दल एक चकार शब्दही काढलेला नाही. बेळगाव जिल्हा प्रशासनाने या नेत्यांना प्रवेशबंदी केली असली तरी एकाही नेत्याने इच्छाशक्ती दाखवली नाही.

बेळगावकर स्वतःच्या हिमतीवर

सीमा भागातील मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा स्वहिमतीवर काळा दिन यशस्वी करून दाखविला. सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यापासून मराठी भाषिकांची लोकशाही पद्धतीपणे करण्यात आलेली आंदोलने मोडून काढली जात आहेत. काळा दिनही त्याला अपवाद राहिला नाही.

ठाकरे गटाचा बाणा कायम

काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आपला बाणा कायम जपला आहे. बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी असतानाही ठाकरे गटातील कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्यांनी कर्नाटक पोलिसांच्या सुरक्षेचे कडे भेदण्याचा प्रयत्न केला. कोगनोळी टोल नाका येथे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना अडवण्यात आले. त्यांच्या भूमिकेमागे आजही आम्ही सीमा भागातील नागरिकांच्या मागे उभे आहोत, हीच भावना ठाकरे गटात दिसून आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT