chandrakant patil
chandrakant patil 
पश्चिम महाराष्ट्र

नाहीतर... भाजप विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही; चंद्रकांत पाटलांचा इशारा

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर: देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक झालेल्या मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा मंत्रिपदाचा राजीनामा २ मार्चपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी अपेक्षा आहे. पण राजीनामा घेतला नाही तर भाजप (BJP) विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिला. (Latest political news)

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमसाठी मनी लॉंड्रिंग केल्याच्या आरोपावरून अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांना महाविकास आघाडीने पाठिंबा देणे म्हणजे दाऊद इब्राहिमला साथ देण्यासारखे आहे, असा घणाघाती आरोप चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

हसीना पारकरने तीनशे कोटींची मालमत्ता बळकावली आणि ती तांत्रिकदृष्ट्या नवाब मलिक यांच्या कंपनीच्या मालकीची असल्याचे दाखविले. दाऊदसाठी मनी लॉंड्रिंग केल्याच्या गंभीर आरोपाखाली सक्तवसुली संचालनालयाने (ED) ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. न्यायालयाने पुराव्यांचा आधारे मलिक यांना ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. अशा स्थितीत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार चालविणारे शरद पवार हे तातडीने नवाब मलिकांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतील, अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मलिक यांच्या राजीनामा घेण्यास नकार दिला. तसेच सर्व मंत्रिमंडळ त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले हे धक्कादायक आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९९२ व १९९३ च्या मुंबईतील दंगल व बॉम्बस्फोटाच्या वेळी देशाच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. आज त्याचे चिरंजीव मुख्यमंत्री असताना मात्र त्या बॉम्बस्फोटाच्या गुन्हेगारांना साथ देणाऱ्या मंत्र्याची पाठराखण करत आहेत, हे धक्कादायक आहे. त्यांना राजकीय तडजोड करायची असली तरी आम्ही ते सहन करणार नाही. त्यामुळे २ मार्च पर्यंत नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाहीतर भाजप विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही. नवाब मलिक यांचा राजीनामा होईपर्यंत भाजपाचे आंदोलन चालूच राहील, असा थेट इशाराच चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

तर याचवेळी बोलताना त्यांनी फडणवीस सरकारचे गुणगाणही गायले. देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी शिक्षण व रोजगाराच्या अनेक योजना सुरू केल्या. पण त्या महाविकास आघाडी सरकारने बंद पाडल्या. त्या पुन्हा चालू करण्यासाठी छत्रपती संभाजीराजेंनी उपोषण केले, त्याबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करतो. सहज होण्यासारख्या कामांसाठी छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले. आता सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे खरंच कारवाई होण्यासाठी राजेंनी पाठपुरावा करावा नाही तर, तोंडाला पाने पुसल्यासारखे होईल, असा इशारा त्यांनी दिला. भाजपाही राजेंच्या साथीने पाठपुरावा करेल, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT