Satej Patil
Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांना कोल्हापूरच्या जनतेने पुन्हा पुण्याला पाठविले : सतेज पाटलांचा हल्लाबोल

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : हिंदुत्व हा आमचा श्वास आहे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा श्वास थांबविण्याचे काम कोल्हापूरच्या (Kolhapur) जनतेने केले आहे. पोटनिवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर भाजपने केला. पण, जनतेने त्यांना भीक घातली नाही. किंबहुना कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमानी बाणा दाखवत चंद्रकांतदादांना पुन्हा पुण्याला पाठविण्याची व्यवस्था केली आहे, असा टोला कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी लगावला. (People of Kolhapur sent Chandrakant Patil back to Pune again : Satej Patil)

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी विजय मिळविला, त्यानंतर माध्यमांशी बोलताना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी भाजप अणि चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की चंद्रकांत पाटील हे पुण्याला गेल्यामुळे त्यांचा कोल्हापूरशी संबंध राहिलेला नाही. बाहेरगावाहून सुमारे सहा ते सात हजार लोक घेऊन ते कोल्हापुरात आले होते. ही पोटनिवडणूक कोल्हापूरच्या स्वाभिमानाची लढाई होती आणि त्यात कोल्हापूरच्या स्वाभिमानाचा विजय झाला आहे. भाजपने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन राजकारण केले. पुण्यातील गुंड घेऊन चंद्रकांत पाटील कोल्हापुरात फिरत होते, असा आरोपही त्यांनी या वेळी बोलताना केला.

पुण्याचे चंद्रकांत पाटील विरुद्ध कोल्हापूरकर अशी ही पोटनिवडणूक होती. त्यामुळे चंद्रकांतदादांना या निवडणुकीच्या निकालातून योग्य असे उत्तर मिळाले असेल. हिमालयात जाण्यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानावर बोलताना सतेज पाटील यांनी सांगितले की, हिमालयात जाण्यासंदर्भात मी काही बोलणार नाही. कारण, ते वक्तव्य त्यांनी स्वतःच केले होते. पण, आम्ही त्यांना पुण्याला नक्की परत पाठविले आहे.

भाजपच्या विखारी प्रचाराला कोल्हापूरकरांचे उत्तर

कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने भाजपचे ध्रुवीकरणाचे राजकारण थांबविण्याचे काम केलेले आहे. राजर्षी शाहू महाराजांचा खरा वारसा देशाला दाखवून देण्याचे काम कोल्हापूरकरांनी दाखवून दिले आहे. ताराराणीच्या या भूमितून पहिली महिला आमदार झालेली आहे. काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली. ध्रुवीकरणाचे राजकारण कोल्हापुरात चालणार नाही. भाजपने जो विखारी प्रचार केला, त्याला विचाराने उत्तर देण्याचे काम कोल्हापूरच्या जनतेने केलेले आहे, असेही पाटील यांनी नमूद केले.

कोल्हापूर पॅटर्न देशाने घ्यावा

गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले की, भाजपने धर्मा धर्मांमध्ये कितीही भांडणं लावली तरी एकत्रपणे लढलो तर आम्ही निवडणुका जिंकू शकतो, असा हा कोल्हापूर पॅटर्न देशाने घेतला पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी आम्ही तिघांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ताकद दिली आणि कोल्हापूरच्या जनतेने योग्य असा कौल दिला आहे.

भाजपने भूमिका जाहीर करावी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांंनी सर्वधर्म समभावाची राज्यघटना देशाला दिली. त्या घटनेवर आता भाजपचा विश्वास आहे की नाही, याबाबतची भूमिका आता त्यांपनी जाहीर केली पाहिजे. ध्रुवीकरण आणि जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोल्हापूरच्या जनतेने हाणून पडला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT