Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, तात्कालिक बदलांमध्ये जिल्हा बँक पुढेही शेतकऱ्यांचीच रहावी

सुहास वैद्य

कोल्हार ( जि. अहमदनगर ) - भगवतीपूर (ता. राहाता) येथील अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या नूतनीकरण केलेल्या शाखेचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांच्या हस्ते झाले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता आहे. या कार्यक्रमात जिल्हा सहकारी बँकेची कार्यपद्धती कशी असावी या संदर्भात आमदार विखे पाटलांनी भाष्य केले. ( Radhakrishna Vikhe Patil said that in the immediate changes, the district bank should continue to be for the farmers )

या उद्घाटन कार्यक्रमाला बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के, डॉ.भास्करराव खर्डे, कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे, सयाजी र.खर्डे, नंदकुमार खांदे, बाबासाहेब दळे, साहेबराव दळे, भास्कर दि. खर्डे, अमोल थेटे, श्रीकांत खर्डे, धनंजय दळे, रावसाहेब क. खर्डे, जिल्हा परिषद सदस्य दिनेश बर्डे, सुनील शिंदे, सरपंच दत्तात्रेय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, इलियास शेख, बँकेचे तालुका विकास अधिकारी उत्तम गुळवे व शाखाधिकारी अनिल खांदे आदी उपस्थित होते.

आमदार विखे पाटील पुढे म्हणाले, की खासगी बँकांच्या स्पर्धात्मक काळात नागरी सहकारी बँका व पतसंस्थांनी अत्याधुनिक बँकिंग प्रणाली स्वीकारली आहे. त्यामुळे वित्तीय संस्थांचे नेटवर्क वाढले व कारभारात अधिक पारदर्शकता येत आहे. अहमदनगर जिल्हा बँकेने आपली प्रतिमा केवळ शेती कर्जापुरतीच मर्यादित न ठेवता इतरही उद्योग व्यवसायाना कर्जवितरण केल्यास त्यातून अधिक ग्राहक जोडले जातील व बँकेचा व्यवसाय वाढेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकिंग क्षेत्रात धोरणात्मक बदल केल्यामुळे सर्वच बँकांपुढील अडचणी दूर झाल्या व त्यांना पाठबळ मिळाले आहे. मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष असताना सुरू केलेली किसान क्रेडिट कार्ड ही बँकेच्या व शेतकरी हिताची योजना मात्र नावापुरतेच राहिली आहे. केवळ नाबार्डची आर्थिक पूर्तता करण्यासाठीच किसान कार्डचा उपयोग होत आहे. क्रेडिटकार्ड ही कुणाची मक्तेदारी नव्हती. शेतकऱ्यांना त्याच्या कुवतीनुसार आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, तात्कालिक बदलांमध्ये जिल्हा बँक पुढेही शेतकऱ्यांचीच रहावी. हाच माझा त्यामागील अट्टाहास होता. त्यात माझी वेगळी भूमिका नव्हती, असे विखे यांनी स्पष्ट केले.

अण्णासाहेब म्हस्के म्हणाले, जिल्हा बँक शेतकरीहिताच्या योजना राबवित आहे. व खास योजनेतून कर्जवितरण करीत आहे. मात्र बागायती भागापेक्षा जिरायती भागातील शेतकरीच वेळेवर कर्जाची परतफेड करतात. कर्जमाफी होण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे यांनी प्रास्ताविकात बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख मांडला. डॉ भास्करराव खर्डे यांचेही भाषण झाले. शाळीग्राम वाणी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT