Radhakrishna Vikhe Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vikhe Patil On Solapur Incident : भंडारा उधळण अन्‌ मारहाणीवर विखे पाटील म्हणतात, ‘कोणत्याही घटनेची स्वाभाविक प्रतिक्रिया असते’

Vijaykumar Dudhale

Solapur News : कोणत्याही घटनेची स्वाभाविक प्रतिक्रिया असते. त्यामुळे कार्यकर्त्यांना वाटलं, त्यानुसार कारवाई करतात.’ तसं न करण्याबाबत मी कार्यकर्त्यांना सांगेन. पण, घटना अशी होती की, कार्यकर्त्यांकडून स्वाभाविक प्रतिक्रिया येणं साहजिक होतं. तसेच, अचानक भंडाऱ्याची उधळण झाल्याने सुरक्षारक्षकांकडून मारहाण झाली. कारण त्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे. पण, संबंधितांवर कारवाई आणि गुन्हे दाखल न करण्याची सूचना मी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (Radhakrishna Vikhe Patil says on Bhandara Udhalan and beating)

धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक शेखर बंगाळे यांनी आज पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात जाऊन निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांवर भंडाऱ्याची उधळण केली. त्यावेळी त्यांना सुरक्षा रक्षक आणि भाजपचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मारहाण केली. त्यावर विखे पाटील बोलत होते

ते म्हणाले की, भंडारा हा कायम पवित्रच मानला जातो. त्या पवित्र भंडाऱ्याची उधळण माझ्यावर झाली, याचा मला आनंदच आहे. प्रतिकात्मक भावना व्यक्त करण्याची एक पद्धत असते. त्यामुळे त्यांनी काही वावगं केलं असं मला वाटत नाही. पण, राजकीय हस्तक्षेपामुळे आरक्षणाबाबतचे गांभीर्य संपत चालले आहे. माझी मराठा आणि धनगर समाज बांधवांना विनंती आहे की, समाजाच्या भावना इथपर्यंत आपण आदर करतो. पण, पाठीमागे राहून काही राजकीय लोक त्याचा गैरफायदा घेतात, हे दुर्दैवी आहे. त्यातून समाजाला न्याय मिळत नाही. आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात.

धनगर आरक्षणाबद्दल देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय केले आहेत. धनगर आणि धनगड या मुद्द्यावर घटनेत ज्या तरतुदी आहेत. त्याच्यावर सध्या खल चाललेला आहे. सर्व सवलती लागू केल्या आहेत. धनगर समाजासाठी नवे महामंडळ स्थापन केले आहे. धनगर समाजातील सहा लाख कुटुंबांना शेळी मेंढी पालनासाठी दहा हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केलेला आहे. इतरही योजना धनगर समाजासाठी सरकार आणत आहे, असेही विखे पाटील यांनी नमूद केले.

सगळेच गोंधळून गेले…

पालकमंत्री म्हणाले की, एखाद्या घटनेवरून भाजपवर परिणाम होईल, असं मला वाटत नाही. मी त्यांचं निवदेन ऐकलं नसतं. अनादर केला असता तर आंदोलनाचं मी समजू शकलो असतो. त्यांची भावना समजून घेत असतानाच भंडारा उधळल्याने सगळे गोंधळून गेले होते. त्यामुळे झटापट झाली. कोणत्या समाजाचा कार्यकर्ता म्हणून त्याला मारहाण करण्याची भूमिका मुळीच नव्हती. काही मंडळी यातून गैरअर्थ काढण्याचा प्रयत्न करतात, ते करू नये, एवढीच आमची विनंती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT