Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Paresh Kapse
पश्चिम महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : शिवसेनेचा महाराष्ट्राच्या हिताशी संबंध नव्हता...

सरकारनामा ब्युरो

Radhakrishna Vikhe Patil : महाराष्ट्रातील वेदान्ता फॉक्सकॉन व टाटा एअर बस हे दोन महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला गेले आहे. त्यावरून महाविकास आघाडीने भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. महाविकास आघाडीच्या आरोपांना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ( Radhakrishna Vikhe Patil ) यांनी प्रतिउत्तर दिले.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सत्ता गेल्याचे वैफल्य आहे. त्यामुळे सरकारचे अपयश झाकण्यासाठी ते बेछुट आरोप करत आहेत. सुरवातीला त्यांनी वेदान्ता फॉक्सकॉनचा प्रकल्प गेल्याचे आरोप केले. त्याबाबतचे सत्य समोर आले आहे. टाटा एअर बसचा प्रकल्प गेला. या प्रकल्पा संदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे जे-ते राज्य आपल्याकडे गुंतवणूक वाढावी म्हणून प्रयत्न करत आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणूक नेहमीच जास्त राहिली आहे. कारण महाराष्ट्रातील वातावरण नेहमी उद्योगांसाठी पोषक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ९ हजार कोटीपेक्षाही जास्तची गुंतवणूक आणण्यासाठी त्यांनी बरेच प्रकल्प निश्चित केले होते. अहमदनगर जिल्ह्याचे उदाहरण घेतले तर सुपा एमआयडीसीतील उद्योग वाढविण्यात फडणवीस यांचाच पुढाकार होता. एक - दोन हजार कोटीची गुंतवणूक त्यात होती. रांजणगाव, चाकण एमआयडीसीत जे प्रकल्प आले त्यावेळीही त्यांचाच पुढाकार राहिला. औद्योगिक विकासात नेहमीच महाराष्ट्राला झुकतेमाप राहिले आहे. एखाद दुसरा प्रकल्प गुजरातला गेला म्हणून आरोपाच ठपका ठेवणे अयोग्य आहे.

औद्योगिक विकासात शिवसेनेचे काय योगदान आहे. त्यांनी कोकणातील नाणार रिफायनरी बाबत सातत्याने भूमिका बदलली. राज्यात एवढी मोठी गुंतवणूक होणार होती. महायुती काळात त्यांचेच उद्योग मंत्री होते. त्यांनी सांगावं. फडणवीसांच्या मंत्री मंडळात सुभाष देसाई कार्यरत होते. त्यांनी मागील पाच वर्षांत राज्यात किती गुंतवणूक आली हे सांगावं. मात्र शिवसेनेचे आरोप म्हणजे अपयश झाकण्यासाठीचा प्रयत्न आहे. त्यांचा महाराष्ट्राच्या हिताशी संबंध नव्हता.

यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करायला आम्हाला हरकत नाही. माजी मंत्री देसाई यांनी श्वेत पत्रिका काढून महाविकास आघाडीच्या व महायुतीच्या काळात किती उद्योग आले या बाबत लिखीत खुलासा द्यावा, म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी होईल, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

राष्ट्रवादीच्या आरोपाला मी महत्त्व देत नाही

राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ नावाला राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांचे अस्तित्त्व महाराष्ट्राच्या बाहेर नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या आरोपांना मी महत्त्व देत नाही, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT