Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग : शिवचरित्र अभ्यासकाचा आरोप

भारत नागणे

पंढरपूर : मशिदीवरील भोंग्यानंतर आता शिवचरित्रावरून वाद सुरू झाला आहे. यामध्ये पंढरपूरचे (Pandharpur) शिवचरित्राचे अभ्यासक अमरजित पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना लक्ष्य केले आहे. (Raj Thackeray's involvement in Shivaji Maharaj's defamation conspiracy : Amarjit Patil's allegation)

राज ठाकरे सातत्याने पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र घरोघरी नेले, असा दावा करतात. याचा अर्थ जेम्स लेनला पुस्तक लिहिण्यास मदत करणाऱ्या तथाकथित इतिहासकारांना त्यांच्याकडून क्लीनचिट दिली जात आहे. तेच या बदनामीच्या कटात सहभागी आहेत, असा खळबळजनक आरोप पंढरपूरमधील शिवचरित्राचे अभ्यासक आणि भांडारकर संस्थेवरील हल्ला प्रकरणातील सहभागी अमरजित पाटील यांनी केला आहे. अमरजित पाटील यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि संभाजी ब्रिगेड आमने सामने येण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या केलेल्या मागणीनंतर आता शिवचरित्राविषयी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे लिखाण करणाऱ्या तथाकथित इतिहासकारांची जाहीरपणे राज ठाकरे यांनी बाजू घेतली आहे. त्यावर शरद पवार यांनी अलीकडेच नाराजी व्यक्त करत जेम्स लेन आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या चुकीच्या भूमिकेचं समर्थन करणाऱ्या राज ठाकरे यांना फटकारले आहे.

पंढरपूरमधील शिवचरित्राचे अभ्यासक आणि भांडारकर संस्था हल्ला प्रकरणातील सहभागी अमरजित पाटील यांनी उडी घेत राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. जेम्स लेनला मदत करणाऱ्या एस. एस. बहुलकर यांना त्यावेळी शिवसैनिकांनी काळे फासले होते. त्यावर राज ठाकरे यांनी बहुलकर यांच्या घरी जाऊन शिवसैनिकांनी केलेल्या कृत्याची माफी मागितली होती, त्यामुळे राज ठाकरेसुद्धा या बदनामीच्या कटात सहभागी झाले आहेत, असाही आरोप पाटील यांनी केला.

यापूर्वी पुरंदरे यांना चर्चेत हरवले आहे आणि त्यांच्याकडून माफीनामा देखील घेतला आहे. आता राज ठाकरेंनी जेम्स लेन आणि भांडारकर संस्थेमधील पुरंदरेलिखित राज शिवछत्रपती यावर खुली चर्चा करावी, असे आव्हान पाटील यांनी दिले आहे. सातत्याने कोणीही ऊठसूठ चुकीची विधाने करत असेल आणि यामुळे राज्यातील सामाजिक वातावरण दूषित होत असेल तर सरकारने पुढाकार घेऊन छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे माहितीपर खंड प्रकाशित करावे, त्यासाठी इतिहास तज्ज्ञांची एक समिती तयार करावी. अधिकृत पुरावे गोळा करून योग्य माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र तयार करावे, अशी विनंतीही पाटील यांनी राज्य सरकारला केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT