Raju Shetty
Raju Shetty sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नरड्यावर पाय देऊन एफआरपी घेऊ; अन्यथा, ऊसतोडी बंद पाडणार...

हेमंत पवार

कऱ्हाड : एकरकमी एफआरपीसाठी वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ, आक्रमक होऊ पण, आम्ही आता कारखानदारांना सोडणार नाही. त्यांच्या नरड्यावर पाय देऊन एकरकमी एफआरपी वसुल केल्याशिवाय सोडणार नाही. ऊसाची वाहतुक रोखुन कारखाने बंद पाडु. अंगावर आलातर शिंगावर घ्यायची तयारी आम्ही केली आहे. त्यासाठी कारखानदारांनी मैदानात यावे, असे खुले आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज येथे कारखानदारांना दिले.

एकरकमी एफआरपीसाठी आयोजीत पत्रकार परिषदेत शेट्टी बोलत होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, स्वाभिमानी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, विश्वास जाधव, दादासाहेब पाटील आदी उपस्थित होते. श्री. शेट्टी म्हणाले, बेळगांव, कोल्हापुर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी जाहीर केली. मात्र, सहकारमंत्री एकरकमी एफआरपी देणे शक्य नाही असे सांगत आहेत. राज्यातील ३० ते ३५ साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे शक्य होते मग, त्यांना का शक्य होत नाही ?

अनेक वर्षानंतर साखरेला चांगला दर मिळत असल्याने साखर उद्योगाला सुवर्णकाळ आला आहे. शेतकऱ्यांचे जगणं मरण ऊस शेतीवरचं आहे, याचे कारखानदारांनी भान ठेवावे. अन्य़था, ते कारखानदारांच्या उरावर बसतील. ते म्हणाले, ''बाजारपेठेत ३८०० रुपयांनी साखरेचे टेंडर होत आहेत. एफआरपी ३१०० रुपये साखरेची किंमत गृहीत धरुन निश्चित केली आहे. मात्र, साखरेचे किंमत वाढल्याने एफआरपी पेक्षा जादा पैसे हे कारखानदारांचे कर्तव्यच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इथेनॉलची किंमत ६० टक्क्यांनी वाढली आहे. साखर उद्योगाचा सध्या सुवर्णकाळ सुरु आहे. तरीही शेतकऱ्यांना फसवले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही.''

साखर आयुक्तांना आम्ही ५० हजार शेतकऱ्यांचे एकरकमी एफआरपी देण्याचे ठराव दिले आहेत. तरीही कारखानदार तुकड्याने एफआरपी घ्यायला शेतकरी तयार आहेत, असे सांगत असतील तर त्या शेतकऱ्यांना पुढे आणावे, त्यांचे पाय धरायची आमची इच्छा आहे. ते म्हणाले, कृषी कायद्याविरोधात सुरु असेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला केंद्र सरकार जातीय आणि प्रांतीय वादाचे स्वरुप देण्याचा प्रयत्न करत आहे. बळीराजा संघटनेमार्फत पंजाबराव पाटील यांनीही आंदोलनाचा इशारा दिला.

सदाभाऊ खोतांवर नाव न घेता टीका

एकरकमी एफआरपी हा केंद्र सरकारचा विषय आहे. त्याला राज्य सरकाराने समर्थन दिले म्हणुन आम्ही त्याला विरोध करत आहोत. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कारखानदार मिळुन शेतकऱ्यांची फसवणुक करत आहे. असे असताना केवळ राज्य सरकारवर टीका करायची आणि केंद्र सरकारवर काहीच बोलायचे नाही, अशी भूमिका घेणाऱ्या संघटनेबरोबर आम्ही नाही, अशी स्पष्टोक्ती राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांचे नाव न घेता त्यांच्या रयत क्रांती संघटनेबाबत केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT