ram shinde
ram shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राम शिंदे म्हणतात, ठाकरे सरकार शेतकरीद्रोही

Amit Awari

अहमदनगर : राज्यात गेल्या महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे हातचे पीक गेले. या अतिवृष्टीबाबत राज्य सरकारने केलेल्या उपाय योजनांवर राज्यातील राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्य सरकारला लक्ष्य करत घनाघाती आरोप टीका केली आहे. Ram Shinde says that Thackeray government is anti-farmer

राम शिंदे म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून केवळ खोटी आश्वासने देत जनतेस झुलवत ठेवणाऱ्या ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात वाऱ्यावर सोडले असून अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकऱ्यास कवडीचीही मदत न देता पाठ फिरविणारे ठाकरे सरकार शेतकरी विरोधी नव्हे, तर शेतकरीद्रोही आहे.

ते पुढे म्हणाले, मागील दोन वर्षांत महाराष्ट्रावर असंख्य नैसर्गिक आपत्ती कोसळल्या. कोरोनासारख्या महामारीत बेपर्वाईमुळे अनेक निष्पाप जिवांचे बळी गेले. टाळेबंदी जाहीर केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्यांना मदतीची घोषणा करून त्यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली. निसर्ग चक्रीवादळात पुरता उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील शेतकऱ्यास मदत देण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी नंतर त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही, उलट मदत मिळाली किंवा नाही याचाही थांगपत्ता नसल्याची कबुली देऊन संकटग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा केली.

दुसऱ्या टाळेबंदीत रोजगार बुडालेल्या हजारो कुटुंबांच्या मदतीसाठी केंद्राकडे बोटे दाखवत नाकर्त्या ठाकरे सरकारने ती जबाबदारीदेखी टाळली. नंतरच्या तौक्ते चक्रीवादळात केवळ धावता दौरा करून मदतीचे गाजर दाखवत परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी या वादळग्रस्तांनाही वाऱ्यावर सोडले, आणि आता अतिवृष्टीच्या भीषण संकटात सापडून, ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांच्या हानीमुळे सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्याविषयी साधी सहानुभूतीदेखील न दाखविता नियमांच्या कागदावर बोटे नाचवत दाखवत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा सुरू आहे, असा आरोप शिंदे यांनी केला.

शाब्दिक फुंकर मारून संकटग्रस्तांचे आश्रू पुसण्याचा कांगावा करताना आपली कातडी बचावण्यासाठी केंद्र सरकारकडे बोटे दाखविणाऱ्या ठाकरे सरकारचा मुखवटा उघडा पडला असून सरकारचा खरा चेहरा शेतकरीद्रोहीच आहे, असे ते म्हणाले.

कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही अशी खोटी आश्वासने देऊनही आता पाच महिने उलटून गेले. वादळग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी अजूनही वाऱ्यावरच आहे, आणि आता अतिवृष्टीग्रस्तांची भर पडली आहे. शेतकरी जेव्हा संकटात भरडला जात होता, तेव्हा हे मुख्यमंत्री राज्यातील जनतेस तिसऱ्या लाटेची भीती दाखवून घरात डांबून ठेवण्यासाठी धडपडत होते. अन्यायाविरुद्धचा जनतेचा संताप दाबण्यासाठीच हे कारस्थान होते, असा आरोपही प्रा राम शिंदे यांनी केला.

राज्यातील महिलांवर अत्याचार झाले, भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली, आणि शेतकरी देशोधडीला लागला, आणि ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही नाकर्तेपणा शिगेला पोहोचला, असे ते म्हणाले. कोरोनाची ढाल पुढे करून स्वतःचा बचाव करणारे व जनतेला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे ठाकरे सरकार महाराष्ट्रद्रोही आणि शेतकरीद्रोही आहे, याचा पुनरुच्चार करून, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईपर्यंत भाजपचा संघर्ष सुरू राहील असा इशारा शिंदे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT