Ramdas Athawale
Ramdas Athawale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

रामदास आठवलेंचे भाकीत : उद्धव ठाकरेंचा गट भविष्यकाळात अत्यंत क्षीण होत जाईल

सरकारनामा ब्युरो

पुणे - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे. राज्यात शिवसेना बंडखोर व भाजपचे सरकार आले आहे. शिवसेनेत निर्माण झालेल्या दुफळीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. या संदर्भात बोलताना केंद्रीय मंत्री तथा आरपीआयचे नेते रामदास आठवले ( Ramdas Athawale ) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. ( Ramdas Athawale's prediction: Uddhav Thackeray's group will become very weak in the future )

राज ठाकरे म्हणाले होते की, 'उद्धव ठाकरे हे काय आहेत हे मला जवळून माहिती आहे'. यावर रामदास आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे काय आहेत व राज ठाकरे काय आहेत हे मला माहिती आहे. ते दोघे चुलत भाऊ आहेत. दोघेही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. ते उद्धव ठाकरेंविषयी काही बोलले असतील तर तो त्यांच्या भावांचा प्रश्न आहे. त्यावादात आम्हाला पडायचे नाही, असे म्हणत त्या वादावर बोलणे त्यांनी टाळले.

ते पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा गट छोटा राहिला आहे. दोन तृतीयांश पेक्षाही जास्त लोक एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना भविष्यात उभारी घेईल, असे मला वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.

देश पातळीवर नरेंद्र मोदी हे खंबीर नेते आहेत. 2024मध्ये मोदीच पंतप्रधान होणार एनडीएचे सरकार येणार. 400 पेक्षाही जास्त जागा भाजपच्या निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मोदींबरोबर एकनाथ शिंदे राहणार आहेत. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल. जरी उद्धव ठाकरे आमच्या बरोबर नसले. मोठी, खरी शिवसेना आमच्या सोबत असल्यामुळे आम्हाला चिंता नाही. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकसभेच्या 48 पैकी 40 जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. माझा रिपब्लिकन पक्ष भाजप व एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहणार आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात चिंता नाही. उद्धव ठाकरे यांचा गट भविष्यकाळात अत्यंत क्षीण होत जाणार आहे, असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

पुणे महापालिका निवडणूक जागा वाटप

पुणे महापालिका निवडणुकीतील जागा वाटपाबाबत त्यांनी सांगितले की, मागील पाच वर्षांत उपमहापौर पद आम्हाला मिळाले आहे. मागील वेळी आमचे पाच नगरसेवक निवडून आले होते. यावेळी 15 ते 16 जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. त्यात 10 ते 12 जागा निवडून आणायच्या असा आमचा निर्धार आहे.

चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यातील सरकार बदलले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले होते की, एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करायचे आणि आपण सत्तेच्या बाहेर रहायचे, असे त्यांनी ठरविले होते. श्रेष्ठींच्या आदेशामुळे ते उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय वरिष्ठ व राज्यातील नेत्यांचाही होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT