Shashikant Shinde, Dyandev Ranjane
Shashikant Shinde, Dyandev Ranjane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

२८ जणांना सोबत घेऊन रांजणे नॉट रिचेबल : शशीकांत शिंदेंचे वाढले टेन्शन!

सरकारनामा ब्युरो

सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वाधिक रंगतदार लढत जावळी सोसायटी मतदारसंघात होत असून राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी आव्हान उभे केले आहे. श्री. रांजणे यांनी विजयाचे गणित डोक्यात ठेऊन सुमारे २८ मतदारांना सुरक्षित स्थळी रवाना केले आहेत. आता प्रचार सुरू असताना आमदार शिंदे जावळी तालुक्यात तळ ठोकून असून स्वतः फिरून मतदारांशी संपर्क करत आहेत. मात्र, शिंदे यांच्यापुढे आव्हान निर्माण करणारे रांजणे मात्र, सध्या नॉट रिचेबल आहेत.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजे मंडळी बिनविरोध होऊन बाजूला झाली आहेत. प्रत्यक्ष निवडणूक लढण्याची वेळ मात्र, जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांवर आली आहे. यामध्ये सहकार मंत्री बाळसाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शशीकांत शिंदे यांचा समावेश आहे. यामध्ये अत्यंत चुरशीची ठरलीय ती जावळी सोसायटीची निवडणूक. येथे आमदार शशीकांत शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी अर्ज भरला.

पण, राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता असल्याने श्री. रांजणे हे माघार घेतील, या विश्वासावर आमदार शिंदें राहिले. पण, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी रांजणे यांच्याशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील यांनीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. तसेच मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जावळीतून लढण्यास सांगितले असल्याचे सांगत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. परिणामी शशीकांत शिंदेंची अडचण झाली. त्यावेळपासून श्री. रांजणे हे नॉट रिचेबल आहेत ते आजपर्यंत कोणाच्याच संपर्कात आलेले नाहीत.

जावळी सोसायटी मतदारसंघात ४९ मतदार आहेत. ज्यांना २४ पेक्षा जास्त मते पडतील तो उमेदवार निवडून येणार आहे. त्यामुळे हे गणित लक्षात घेऊन ज्ञानदेव रांजणे यांनी २८ मतदारांना सुरक्षित स्थळी रवाना केले आहे. ते राजस्थान परिसरात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारांपर्यंत कोणी पोहोचू नये, तसेच ऐनवेळी दगा फटका होऊ नये, हे लक्षात घेऊन रांजणे या मतदारांसह नॉट रिचेबल आहेत.

तसेच सौरभ शिंदे यांच्याकडे तीन, चार मते आहेत. हे मतदारही सुरक्षित स्थळी आहेत. ही मते निर्णायक होऊ शकतात. तर आमदार शशीकांत शिंदेंनी आतापर्यंत २१ मतांची जुळवा जुळव केल्याचे सांगितले जात आहे. त्यांना विजयासाठी तीन, चार मते कमी पडणार आहेत, त्यासाठी त्यांची जुळवा जुळव सुरू असून त्यांनी सौरभ शिंदेंशी संपर्क वाढविला आहे.

सध्या जावळी तालुक्यात आमदार शशीकांत शिंदे यांनी मतदारांशी संपर्क मोहिम सुरू केली आहे. पण, रांजणेंनी त्यांच्या विजयाचे गणित जुळेल, इतके मतदार सुरक्षित स्थळी नेले आहेत. त्यांचाही संपर्क होत नाही. त्यामुळे हे मतदार मतदानाच्या दिवशीच साताऱ्यात येणार आहेत. तसेच शशीकांत शिंदे यांनीही काही मतदार सुरक्षित स्थळी रवाना केलेले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT