Subhash Deshmukh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politic's : हैदराबादला गेलेले ५२ सरपंच-उपसरपंच म्हणजे हौशे, गौसे; बीआरएस प्रवेशाची भाजप आमदाराने उडवली टिंगल

सरकारनामा ब्यूरो

Solapur News : माजी सहकार मंत्री तथा भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील ५२ सरपंच आणि उपसरपंचांनी भारत राष्ट्र समितीमध्ये सोमवारी (ता. ७ ऑगस्ट) प्रवेश केला, त्यामुळे भाजपला धक्का बसल्याचे मानले जात आहे. त्यावर आमदार देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘हौसे, गौसे हैदराबाद फिरायला आणि मजा करायला गेले होते. दक्षिणमध्येच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात भाजप मजबूत आहे,’ असा दावा केला आहे. (Reaction of BJP MLA Subhash Deshmukh on entry of 52 Sarpanch-Deputy Sarpanchs into BRS)

भाजपतून (BJP) भारत राष्ट्र समितीत प्रवेश केलेले नागेश वल्याळ आणि सचिन सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यात तब्बल ५२ सरपंच (Sarpanch) आणि उपसरपंच हे हैदराबादला जाऊन बीआरएसमध्ये सहभागी झाले आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे. मात्र, या राजकीय घडामोडीची आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी टिंगल उडवली आहे.

सुभाष देशमुख म्हणाले की, भारतीय जनता पक्ष केवळ दक्षिण सोलापूर तालुक्यातच नाही, तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात मजबूत अवस्थेत आहे. तालुक्यातील काही हौशे गौसे हैदराबाद फिरायला आणि मजा करायला गेले होते. मात्र, अनेकांनी हैदराबादहूनच मला फोन करून ‘आपण भाजपासोबत आहोत, अशी ग्वाही दिली आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत २०१४ पेक्षा जास्त मतदान झाले होते. आता २०१९ पेक्षा आगामी २०२४ च्या निवडणुकीत भाजपला जादा मतदान होईल, अशा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीला कोणत्याही पक्षातून कोणालाही उभा राहण्याचा अधिकार आहे. हैदराबादला काल गेलेले सर्वजण हौसे होते. हैदराबादला पोचल्यानंतर अनेकांनी मला फोन करून सांगितले की आम्ही मजा करायला हैदराबादला आलो आहोत. आम्ही कायम भाजपसोबतच आहोत, असेही त्यातील अनेक सरपंचांनी मला सांगितले, असा दावाही देशमुख यांनी केला.

देशमुख म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१४ ते २०१९ या काळात दक्षिण सोलापूरमध्ये विकासाची अनेक कामे झाली. मात्र, मागील दोन अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र अत्यंत कमी निधी मिळाला होता. त्यानंतर मात्र गेली सव्वा वर्षात २०० कोटींपेक्षा जादा निधी तालुक्यात आलेला आहे. त्या कामावर जनता खूष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहे. कोणी कुठंही गेलं तरी दक्षिण सोलापूरमध्ये भाजपला २०१९ पेक्षा २०२४ मध्ये जादा मतदान होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT