MP Prataprao Jadhav
MP Prataprao Jadhav Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सख्खा भाऊ हा उद्धव ठाकरेंसोबत का गेला? : प्रताप जाधवांनी दिले उत्तर...

सरकारनामा ब्युरो

मुंबई - राज्यातील शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गट व भाजप बरोबर गेले आहेत. त्यांनी त्यांचा गट नेताही निवडला आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेय. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना बंडखोर खासदारांवर कारवाई करण्याबाबत पत्र दिले आहे. या संदर्भात बंडखोर खासदार प्रतापराव जाधव ( Prataprao Jadhav ) यांनी आम्ही पक्षच सोडला नसल्याने कारवाईचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले. Shivsena News Update

प्रतापराव जाधव म्हणाले, आमच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही, कारण आम्ही पक्ष सोडलेला नाही. आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेनेतील 18 पैकी 12 लोकांनी आपला गटनेता बदलला आहे. लोकसभेच्या अध्यक्षांनी नियमानुसार आमच्या गटनेत्याला मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूनेच लागेल. कारण आम्ही पक्षांतर केलेले नाही. आम्ही पक्ष सोडून गेलो नाही. पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन केलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रतापराव जाधवांच्या बंधूंनी उद्धव ठाकरेंबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यावर त्यांनी सांगितले की, आमच्या सर्व खासदारांनी सोशल मीडियावरून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आमचे काही राजकीय वैर नाही. त्यांच्या बरोबर आम्ही एवढे दिवस होतो. त्यांनीही मला शुभेच्छा दिल्या असतील. स्मिता ठाकरे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे काही वेगळे वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.

राजकारणात प्रत्येकाला राजकीय अपेक्षा असतात. ज्यांना वाटते आपल्या राजकीय अपेक्षा इथे पूर्ण होणार नाहीत. जो-तो आपल्या राजकीय सोईने निर्णय घेत असतो. असे अनेक जुने उदाहरणे तुम्हाला पहायला मिळतील. इतिहासात व वर्तमानातही अशी उदाहरणे आहेत. मागील महापालिका निवडणुकीत माझा भाऊ नगरसेवक झाला. 24 पैकी 14 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले होते. आम्हाला वाटले होते की त्याला नगर उपाध्यक्ष करतील मात्र शिवसेना शहर प्रमुखाला संधी दिली. यावेळीही कितीही बहुमताने नगरसेवक आले तरी पद मिळणार नाही म्हणून राजकीय अपेक्षेने माझ्या भावाने तो निर्णय घेतला असावा. आमचे घरगुती वैयक्तिक वाद नाहीत, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी स्वतःसाठीच गद्दार शब्द लावावा

मी 1986-87पासून शिवसेनेत काम करतो. माझ्या बुलडाणा जिल्ह्यात मी शिवसेनेचा फाऊंडर आहे. आम्ही शिवसेनेत येताना कोणतीही राजकीय अपेक्षा ठेवली नव्हती. बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्त्ववादी विचार, त्यांची भुमिका आम्हा तरुणांच्या मनात भिनली. त्या विचाराने आम्ही शिवसेना गावा-गावात नेली. आम्हाला वाटू लागले की आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देत आहोत. सेक्युलर लोकांबरोबर जावून आपण हिंदुत्त्व कुठे तरी मागे सोडत आहोत. म्हणून आम्ही शिवसेनेत आहोत. बाळासाहेबांचे आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत. म्हणून आम्ही कोणाशी गद्दारी केलेली नाही. उलट जे बाळासाहेबांच्या विचारापासून दूर जात असतील त्यांनी स्वतःसाठी तो शब्द लावाला, असा टोलाही त्यांनी लगावला.

2019मध्येच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचे नाव पुढे केले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे आले. पक्षात फुट पडण्याचे कारण म्हणजे, उद्धव ठाकरे यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाले. ते मुख्यमंत्री झाले म्हणून एवढे मोठे स्थित्यंतर महाराष्ट्रात घडले, असे मत त्यांनी मांडले.

एनडीए उमेदवारालाच मतदान

आम्ही खासदारांनी एनडीए बरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एनडीएच्या उमेदवारालाच मतदान करणार आहोत. प्रत्येक जण आपापल्या सोयीने अर्थ काढतो. देशात लोकशाहीचे राज्य आहे. सर्वोच्च न्यायालय सर्व बाबींचा विचार करून निर्णय देईल. एकनाथ शिंदे यांनी एवढे मोठे धाडस सर्व तांत्रिक बाजू तपासूनच केले असेल, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT