Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Siddheshwar Factory : एकाचा खासगी कारखाना, तर दुसऱ्याचा काडादींसोबत जुना वाद : चिमणीच्या विरोधामागील खेळी रोहित पवारांनी केली उघड

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (Siddheshwar Sugar factory) चिमणीच्या आडून राजकारण खेळले जात आहे. विमानसेवेला पर्याय असतानाही एकजण स्वत:च्या खासगी कारखान्यासाठी आणि दुसरा काडादी घराण्यासोबतचा जुना वाद ‘चिमणी’च्या आडून खेळत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केला. (Rohit Pawar said reason behind the opposition to Siddheshwar factory chimney)

आमदार रोहित पवार हे रविवारी सोलापूरच्या (Solapur) दौऱ्यावर आले होते. त्यांनी रात्री गंगा निवासस्थानी जाऊन सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सर्वेसर्वा धर्मराज काडादी यांची भेट घेतली. त्या ठिकाणी झालेल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत चिमणीसंदर्भात पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले की, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात ५२ वर्षांपासून मोठे योगदान राहिले आहे. तब्बल २७ हजार शेतकरी सभासद असलेल्या या कारखान्याने दरवर्षी ४५० कोटींची उलाढाल करत शेतकऱ्यांचे कल्याणच केले आहे.

आमदार पवार म्हणाले की, सोलापूरच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात काडादी घराण्याचे मोठे योगदान राहिले आहे. काडादी यांनी सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिला आहे. सिद्धेश्वरला सध्या १७ हजारांपेक्षा अधिक शेतकरी आपला ऊस घालतात. काही दिवसांपूर्वी काढण्यात आलेला मोर्चा कोणा एका नेत्याचा नव्हे, तर शेतकऱ्यांनी स्वत:हून काढलेला होता. विमानसेवेला पर्याय असतानाही काही पुढारी कारखान्याच्या चिमणी पाडण्यावर टपले आहेत. त्यातून कोणाच्या खासगी कारखान्याला ऊस मिळेल, कोणत्या घराण्याचा फायदा होईल, याचा विचार सर्वांनीच करणे आवश्यक आहे.

बोरामणी विमानतळासाठी भाजपच्या आमदार-खासदारांनी प्रयत्न करावेत

‘माळढोक’साठी नगर जिल्ह्यातील सर्वाधिक क्षेत्र आरक्षित आहे. त्यानंतर आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन विमानसेवा सुरू करण्यासाठी वन जमिनीचा प्रश्न मार्गी लावला. सोलापुरात तर खासदार भाजपचेच, सर्वाधिक आमदारही भाजपचेच आहेत. त्यानंतरही बोरामणी येथील विमानतळासाठी फॉरेस्ट जमिनीचा तिढा कसा सुटू शकत नाही. बोरामणी विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदारांनी केंद्रात नेटाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. चिमणीशिवाय कारखान्याला पर्याय नाही. पण, विमानसेवेला पर्याय असूनही चिमणी पाडण्यासाठी हट्ट का करण्यात येत आहे. यामागे नेमकं राजकारण कोणं करतयं, याचाही विचार करण्याची गरज आहे. कारखाना आणि शेतकऱ्यांच्या बाजूंनी आम्ही उभे राहू, असेही रोहित पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.

महेश कोठेंचे काडादींना समर्थन

श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी बांधण्यासाठी सोलापूर महापालिकेने त्यावेळी रितसर ‘एनओसी’ दिली होती. पण, विमानतळ विकास प्राधिकरणासह अन्य काही परवानग्या घेणे अपेक्षित होते. त्यावेळी राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कारखान्याची अडवणूक करण्यात आली. कारखान्याची चिमणी विमानसेवेला अडथळा ठरत नाही. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिनी ५० पेक्षा अधिक विमाने त्याठिकाणी उतरू शकतात. मग, आता चिमणी पाडण्याची मागणी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत महेश कोठे यांनी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे बोट दाखवत काडादीच्या समर्थनासाठी पुढे आले.

सिद्धेश्वर कारखान्याचे चेअरमन पुष्कराज काडादी, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, महेश कोठे, सुधीर खरटमल, संतोष पवार, किसन जाधव, तौफिक शेख, सिद्धाराम चाकोते, प्रशांत बाबर, अजमल शेख, अयाज दिना, नजीब शेख आदी या वेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT