Sangli News : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या मदनभाऊ पाटील गटाच्या नेत्या जयश्री पाटील यांच्यावरून आता येथे राजकारण चांगलेच तापलं आहे. जयश्री पाटील यांनी काँग्रेसवर टीका केल्याने जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनी जोरदार टीका केली होती. त्या टीकेला भाजपवासी झालेल्या माजी महापौर किशोर शहा यांच्यासह मदनभाऊ समर्थकांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी भाजपच्या प्रवेशासाठी नेत्यांचे उंबरे कोणी झिझवले? असा सवाल केला होता. तर ज्यांनी कधी विकास केला नाही? ज्यांना 10 वर्षात सधा नगरसेवक निवडून आणता आला नाही. त्यांनी जयश्रीताईंच्या प्रवेशावर आणि कारणावर बोलू नये असा इशारा दिला होता. त्यानंतर आता या टीकेला काँग्रेसने प्रसिद्धी पत्रकाव्दारे उत्तर दिले आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक दिलीप पाटील, विजय घाडगे, रविंद्र वळवडे आणि अल्ताफ पेंढारी यांनी काढलेल्या या प्रसिद्धी पत्रकातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यांनी, पृथ्वीराज पाटील या व्यक्तीच्या अंगावर राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील डाग असेल तर विरोधकांनी तो शोधून दाखवावा. त्यांनी एखादी संस्था बुडवली असेल, एखाद्या व्यक्तीची ठेव बुडवून संसार उद्ध्वस्त केला असेल, वाडवडिलांनी मिळवलेली पुण्याई धुळीला मिळवली असेल तर शोधून दाखवावी, असे खुले आव्हान केले आहे.
तसेच या नेत्यांनी भाजप प्रवेशावरून पृथ्वीराज पाटलांनी भाजपच्या नेत्यांचे उंबरे झिझवले? या केलेल्या आरोपाचा समाचार घेतला असून ते सत्ताधारी पक्षातील नेत्यांना सांगलीच्या विकासाच्या मुद्यावर भेटतात. त्यांनी स्वार्थासाठी कुणाचे पाय धरलेले नाहीत, असा टोला लगावला. 2014 ला भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेसचे नेते घरात लपून बसले होते. लाभार्थी पळून गेले होते. त्यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी मोजके लोक सोबत घेऊन विरोधाचा झेंडा फडकत ठेवला. नागरी प्रश्नांवर आक्रमक पवित्रा घेतला. काँग्रेस जीवंत ठेवली. त्याचे बक्षिस म्हणून पक्षाने 2019 ला विधानसभेची उमेदवारी दिली आणि सांगलीकरांनी भरभरून मतदानदेखील केले. त्यावेळी विजय निश्चित झाला असता, मात्र ‘आम्ही नाही तर कुणीच नाही’ हे काहींचे घातकी धोरण आडवे आले.
2024 ला तर राजकारणाचा सौदाच झाला. पृथ्वीराजबाबांच्या काँग्रेस पक्षातील कामाबद्दल कुणी बोलूच नये, त्यांच्याबद्दल जनमाणस काय आहे, हे घरातून बाहेर पडून पहावे. निवडणुका आल्यानंतर घर सोडणाऱ्यांना लोकांनी जागा दाखवलेली आहे. पृथ्वीराज पाटील भानगडी लपवण्यासाठी भाजपात निघाले आहेत का? असे म्हणणाऱ्यांनी दिव्याखालचा अंधार पहावा.
सांगली महापुरात कुणामुळे बुडते? कुणी भूखंडाचे श्रीखंड खाल्ले? ओतांचा बाजार कुणी केला? नाले कुणी हडप केले? बीओटीचा बाजार मांडून सांगली कुणी लुटली, हे सांगलीकरांना तोंडपाठ आहे. राहिला विषय, नगरसेवक निवडून आणण्याचा... तुम्ही निवडून आणलेल्या लोकांना ‘डिपॉझिट वाचवता आले नाही, त्याचे काय करायचे, यावर मंथन करा. आमची चिंता करू नका, आमच्या सदऱ्यावर डाग नाही, असे उत्तरही त्यांनी दिले आहे.
पृथ्वीराज पाटील यांनी शेतकरी बँकेतील पैशासंदर्भात ठेवीदारांच्या पैशाची काळजी घेतली, हे उघडच आहे. शेतकरी बँकेतील कोट्यावधीची कर्जे कोणाच्या सांगण्यावरून कोणाला दिली? बोगस कर्जदार कसे उभे केले, त्याचा लाभ कोणी कोणी घेतला, याचा खुलासा किशोर शहा, संतोष पाटील, उत्तम साखळकर यांनी करावा.
महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आल्यानंतर पृथ्वीराजबाबा पाटील यांनी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. ते आमदार नसताना त्यांनी फक्त संपर्काच्या जोरावर सांगलीच्या विकासासाठी ताकद लावली. काँग्रेसच्या नगरसेवकांना विश्वासात घेत त्यांच्या प्रभागात तो निधी दिला. बाबांकडे बोट दाखवणाऱ्या माजी नगरसेवकांनी तो निधी आणि त्याचा घेतलेला लाभ जरा आठवावा, असा टोलाही या प्रसिद्धी पत्रकातून लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.