Sangali News : सुमारे 4 वर्षाच्या खंडानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 6 नगरपालिका आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. विधानसभेनंतरची राजकीय समीकरणे बदललेली आहेत. गेल्या काही दिवसांत भाजप आणि विरोधकांमध्ये वाद चिघळले. त्यामुळे शहरी मतदार कोणाच्या पाठीशी राहतात, हे दाखवण्याची परीक्षा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जिल्ह्यातील इतर आमदारांसाठीही ही सत्त्वपरीक्षा आहे.
अर्ज माघारीनंतर या निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले असून नगराध्यक्ष पदासह सत्ताप्राप्तीसाठी सर्व पक्ष, आघाड्या सज्ज झाल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांनी भाजप मजबूत करण्यासाठी मोठी भरती केली असून त्यांचे मुख्य राजकीय लक्ष्य जयंत पाटील असल्याचे दिसते. दुसरीकडे जयंत पाटीलही पूर्णपणे मैदानात उतरले आहेत. तर इतर आमदरांनाही आपपल्या नगरपालिकांचे गड वाचवावे लागणार आहेत. त्यामुळे वर्चस्वाच्या लढाईत या निवडणूकांचे निकाल त्यांचे भवितव्य ठरवणार आहेत.
चार वर्षापूर्वी नगरपालिका- नगरपंचायतीच्या मुदती संपल्या त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या मुदतीही संपल्या. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून या निवडणुका प्रलंबित राहिल्या दरम्यान, राज्यात मोठे राजकीय बदल झाले राष्ट्रवादी व शिवसेना दुभंगल्या काँग्रेसमधील काही नेते भाजपत गेले. अशी उलथापालथ झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. याचा पुढील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवरही परिणाम होणार आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईश्वरपूर व आष्टा नगरपालिकांमध्ये कसोटी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचे मताधिक्य घटल्याने या ठिकाणी त्यांना आपले स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम हे पलूसमध्ये नेतृत्व सिद्ध करण्याच्या परीक्षेत आहेत. पलूसमध्ये भाजप व राष्ट्रवादीचे आव्हान आहे. जतमध्ये काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत यांची परीक्षा त्यांच्याच नेतृत्वावर अवलंबून आहे. या ठिकाणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर जोरदार प्रयत्न करीत आहेत.
जत आटपाडी आणि विटा पडळकर (Gopichand Padlkar) आक्रमक पवित्र्यात आहेत. मात्र त्यांना महायुतीतीलच शिवसेना आमदार सुहास बाबर यांचे कडवे आव्हान आहे. आटपाडीत प्रथमच निवडणूक होत असल्याने बाबर- पडळकर यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे. शिराळ्यात आमदार सत्यजित देशमुख यांना माजी आमदार मानसिंग नाईक व शिवाजीराव नाईक यांच्या आघाडीशी सामना करावा लागणार आहे.
तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा आमदार रोहित पाटील आणि भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांच्यात अंतर्गत संघर्षाचे संकेत आहेत. लोकसभा व विधानसभा दोन्हीमध्ये पराभूत झालेल्या संजय पाटील यांच्यासाठी ही निवडणूक नेतृत्व पुनर्स्थापनेसाठी महत्त्वाची आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत त्यांच्याकडे असून तासगाव नगरपालिका मिळविण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. एकूणच सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुका असल्या तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील सहा आमदारांच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे.
जयंत पाटील - ईश्वरपूर, आष्टा
विश्वजित कदम - पलूस, जत
गोपीचंद पडळकर - जत, आटपाडी, विटा
सुहास बाबर - आटपाडीतील कडवे आव्हान
सत्यजित देशमुख - शिराळ्यात नाईक आघाडीसोबत टक्कर
रोहित पाटील-संजय पाटील तासगावात सरळ संघर्ष
या निवडणुक निकालांचा दीर्घकालीन परिणाम पुढील जिल्हा परिषद व पंचायतीवर प्रभाव राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.