BJP Vs NCP News : सातारा जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या दहिवडी नगपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सत्ता खालसा झाली आहे. नगराध्यक्ष सागर पोळ यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणलेला अविश्वास ठराव 14-0 मतांनी मंजूर झाला. ग्रामविकासमंत्री आणि भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी भाऊ शेखर गोरे यांना हाताशी धरत हे ऑपरेशन यशस्वी केले. विशेष म्हणजे दोन्ही गोरे बंधूंना राष्ट्रवादीतीलच नाराज सदस्यांनी एकमताने साथ दिली.
दहिवडी नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या गटाची सत्ता होती. 17 पैकी 8 राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि एक अपक्ष नगरसेवक असे बहुमत होते. पण तर भारतीय जनता पक्षाचे पाच व शेखर गोरे गटाचे तीन असे विरोधी सदस्यांची संख्या होती. हा कारभार सुरळीत सुरु असतानाच सोसायटी निवडणूक लागली. त्यात ठरवलेल्या काही गोष्टी ज्येष्ठ मंडळींनी पूर्ण करणे गरजेचे असताना तसे घडले नाही. त्यामुळे सत्ताधारी गटातील नगरसेवकांची अंतर्गत नाराजी वाढत गेली.
यातूनच सागर पोळ यांनी राजीनामा देऊन इतरांना संधी द्यावी, असा सूर निघू लागला. पण सागर पोळ यांनी सोसायटी निवडणुकीदरम्यान ठरल्याप्रमाणे वागावे तर मी राजीनामा देतो असे स्पष्ट सांगितले. संबंधित प्रकरण मिटवण्यात प्रभाकर देशमुख यांना अपयश आले. शेवटी चेंडू आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोर्टात गेला. तिथे ही सर्व परिस्थिती समजून सांगितल्यावर काही काळ नगरसेवक शांत झाले. पण परंतु अंतर्गत कलह काही मिटला नाही.
काठावरचे बहुमत असल्याने या कलहाला विरोधकांनी फुंकर घातली. अखेर याचा भडका उडाला आणि सागर पोळ यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला. ठरावावरील मतदानावेळी सागर पोळ यांच्यासह दोन नगरसेवक अनुपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 5,भाजपचे 5 आणि शेखर गोरे गटाच्या 3 आणि एका अपक्ष नगरसेवकांनी एकत्र येऊन हा ठराव आणला. सर्व १४ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे नगराध्यक्ष सागर पोळ यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला.
आता दहिवडी नगरपंचायतीचा नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आताच्या परिस्थितीमध्ये कोणाकडेच पुरेसे संख्याबळ नसल्याने स्पष्ट बहुमत होण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे ज्या कोणाला नगराध्यक्ष बनायचे असेल त्यांना इतरांच्याच मदतीची गरज लागणार आहे.
दहिवडी हे तालुक्याचे ठिकाण असून सर्वांगीण विकास साधण्यासाठी मुबलक निधीची गरज असते. नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता होती मात्र राज्यात सत्ता विरोधात असल्याने निधीची कमतरता जाणवत होती. त्यामुळे दहिवडीचा सर्वांगीण विकास थांबला आहे. अशात जयकुमार गोरे यांच्याकडे गावे व नगरपंचायतींना निधी देऊन त्यांचा विकास करण्याचे महत्वाचे ग्रामविकास खाते आहे. त्यामुळे नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता जास्त आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर शेखर गोरे यांनी जिल्हा संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी राजकीय भूमिका जाहीर केली नव्हती. परंतु तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माढ्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी बंधू जयकुमार गोरे यांच्यासोबतचे वाद मिटवले होते. जयकुमार गोरे यांना मदत करत त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.
आता जयकुमार गोरे आणि शेखर गोरे एकत्र आहेत. नगरपंचायतीत दोघांचे मिळून 8 आणि अपक्ष एक असे 9 नगरसेवक आहेत. त्यातच गोरे बंधूंची बहिण सुरेखाताई पखाले या नगरसेविका आहेत. त्यामुळे शेखर गोरे गटाला संधी मिळून सुरेखाताई पखाले नगराध्यक्ष होणार का? हे ही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. याशिवाय भाजपकडून माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक धनाजी जाधव, नगरसेवक रुपेश मोरे, नगरसेविका निलम जाधव यांची नावे चर्चेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.