Mahesh Shinde, Shashikant Shinde
Mahesh Shinde, Shashikant Shinde sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पवारांवर टीका करण्यापुर्वी आपली उंची तपासा ; शशिकांत शिंदेंचा महेश शिंदेवर हल्लाबोल

सरकारनामा ब्युरो

सातारा : साताऱ्यात शिवसेना आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे आमनेसामने आले आहेत. त्याचे कारण ठरले रयत शिक्षण संस्था आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) मागील काही दिवसांपासून सातत्याने रयत शिक्षण संस्था (rayat shikshan sanstha) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना दिसून येत आहेत. यावर शरद पवारांचे रयतमधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची किती याची तपासणी करावी. चांगल्या चाललेल्या संस्थेवर टीका करून नाहक बदनामी करू नका. अन्यथा, तुमचे स्वतःचे राजकारण संपेल, असा इशारा देत आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी आमदार महेश शिंदे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

शशिकांत शिंदे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून मोठा व्हावा, या उद्देशाने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था उभी केली होती. सध्याच्या आधुनिक व स्पर्धेच्या युगात ही संस्था टिकवण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी केले. शैक्षणिक स्पर्धेत दर्जा आणि सुविधा देण्याचे काम सरकारचे आहे. पण अनुदान असे कितीसे मिळते. त्यापेक्षा १२ ते १५ कोटी रुपयांचा निधी केवळ शरद पवार यांच्या आव्हानावरून मिळतो. संगणकापासून ते इंजिनिअरिंगपर्यंत अनेक प्रकल्प शरद पवारच अध्यक्ष झाल्यापासून या संस्थेत सुरु केले आहेत. शासकीय अनुदान व्यतिरिक्त निधी उभा करण्याची किमया या महाराष्ट्रात त्यांच्याच माध्यमातून झाले आहे. अनेक लोक इतर संस्थेचे अध्यक्ष आहेत, परंतु त्यांचे योगदान आणि शरद पवार यांचे रयत मधील योगदान पाहता त्यांच्याबद्दल बोलताना आपली उंची किती याची तपासणी करावी. आपण किती बोलतो याचे भान ठेवावे, असाही सल्ला शशिकांत शिंदे यांनी दिला.

शिंदे पुढे बोलताना म्हणाले, बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शरद पवार शैक्षणिक व आर्थिक मदत करत आहेत. गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण तसेच इतर बाबतीत मदत करतात. पण, ते याचा कधीही गवगवा करत नाहीत. त्यामुळे रयत शिक्षण संस्थेवर बोलताना रयतेचा परिवार हा जिल्हा पुरता नसून महाराष्ट्रात सर्वदूर पसरला आहे, याचे भान ठेवावे. केवळ शरद पवार यांचा पाठिंबा आहे, म्हणून ही संस्था आधुनिकतेच्या पायावर उभी असून यशस्वी वाटचाल करत आहे. या संस्थेमुळे सातारा शहरासह जिल्ह्याचा दर्जा सुधारला आहे. शरद पवार यांनी रयत शिक्षण संस्थत योगदान दिले आहे, त्याप्रमाणे राज्यातील व देशातील प्रत्येक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. देशाचे पंतप्रधान ही त्यांचे कौतुक करतात. त्यामुळे त्यांच्यावर टीका करताना आपली उंची तपासावी.

तुमच्या सहकाऱ्यांना विचारावे की ४० लाख रुपये घेऊन कुठे भरती झाली होती. एक निर्णय चुकीचा झाला तर मोठ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे धाडस शरद पवार यांनी दाखवले. संस्थेची पवित्रता व नावलौकिक बिघडविण्याचे काम काही वाईट विचाराचे लोक करत आहेत. सत्तेच्या माध्यमातून मिळालेली संधीत नेत्यांविषयी भान ठेऊन बोलण्याची तुमची संस्कृती नाही, हे आम्ही सांगणे योग्य नाही. त्यामुळे शरद पवार यांचे योगदान किती आहे, हे लक्षात घेऊन मगच त्यांनी बोलावे. त्यासाठी आपण रयत शिक्षण संस्थेच्या एका वार्षिक सभेला उपस्थित राहावे. त्यांचे व्हिजन बघा पहावे. त्यात कमी वाटत असेल तर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू अनिल पाटील अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी जाऊन चर्चा करावी किंवा रयत परिवाराकडून तुम्ही माहिती घ्यावी. राजकारणात कार्यरत असताना काही ठिकाणी काम करायला संधी मिळते. त्यावेळी चांगल्या चाललेल्या संस्थेवर टीका करून तिची नाहक बदनामी करू नका. अन्यथा, तुमचे स्वतःचे राजकारण संपेल, असा सल्ला आमदार शशिकांत शिंदे यांनी केली दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT