Jaykumar Gore-makrand patil-shambhuraj desai- Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara ZP : सातारा जिल्हा परिषेदत राष्ट्रवादी अन् शिवसेना एकत्र : शंभुराज देसाई, मकरंदआबांचा भाजपला शेवटच्या क्षणी दणका

Satara Political News : साताऱ्यात शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत असल्याची घोषणा केल्याने भाजप सत्तेतून बाहेर पडली आहे. दोन्ही पक्षांच्या या युतीमुळे अध्यक्ष निवडीत नवा पेच निर्माण झाला.

Hrishikesh Nalagune

Satara ZP : सातारा जिल्हा परिषदेत आज (शुक्रवार, 20 मार्च) अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी अवघे काही तास बाकी असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र ही निवडणूक लढणार असल्याची घोषणा मंत्री शंभुराज देसाईंनी केली. त्यामुळे या निवडणुकीत भाजप साईडलाईन झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेत जाण्यापूर्वी देसाई यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली.

65 सदस्यांच्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या सर्वाधिक 27 जागा निवडून आल्या आहेत. पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेने निवडणूक पूर्व आघाडी केली होती. या आघाडीतील राष्ट्रवादीला 20 आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. स्वाभिमानीच्या एका सदस्यानेही राष्ट्रवादीसोबतच गटनोंदणी केली आहे. असे मिळून या आघाडीकडे 36 चे संख्याबळ आहे. बहुमतापेक्षा हा आकडा दोनने जास्त आहे.

भाजपने विशेषतः मंत्री जयकुमार गोरे यांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत आक्रमक भूमिका घेत मित्रपक्षांना फारशी किंमत दिली नव्हती. त्यावरून मंत्री शंभुराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना या आघाडीसाठी पुढाकार घेतला होता. आता निकालानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेने भाजपला वगळून सत्ता स्थापन करावी अशी भूमिका घेतली आहे.

संख्याबळात मोठा उलटफेर?

अध्यक्ष निवडीच्या दोन तास आधीच संख्याबळाच्या बाबतीत मोठे उलटफेर बघायला मिळत आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असे चित्र असतानाच पारडं पुन्हा भाजपच्या बाजूने झुकल्याचे चित्र आहे. भाजप आमदार, मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचा 1 आणि शिवसेनेचे 2 सदस्य गळाला लावल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या लता कर्णे यापूर्वीच भाजपच्या गोटात सामील झाल्या आहेत.

आता शिवसेनेचेही 2 सदस्य भाजपच्या बाजूने गेले असल्याचे बोलले जाते. असे झाल्यास भाजपचे संख्याबळ 30 पर्यंत जाते. या आघाडीतील 3 सदस्य भाजपच्या गळाला लागल्यास शिवसेना राष्ट्रवादीचे बहुमताचे गणित डळमळू शकते. याशिवाय अपक्ष 1, स्वाभिमानी एक आणि काँग्रेसच्या एका सदस्यावरही भाजपचा डोळा आहे. यामुळे जिल्हा परिषदेत मतदानावेळी काय होणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT