Satara, 15 February : जिल्हा परिषदेचा निकाल लागून रविवारी (ता. १५ फेब्रुवारी) सात दिवस झाले तरी सातारा जिल्हा परिषदेतील सत्तेचा फैसला होऊ शकलेले नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडी केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे बहुमत आहे. मात्र, त्यांनी अद्यापही सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. त्यांना भाजपच्या निरोपाची प्रतिक्षा आहे. पण, भाजपने अध्यक्ष आमचाच होणार, असा दावा केल्याने साताऱ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. मात्र, भाजपचा अध्यक्ष कसा होणार, शिवसेना विशेषतः पालकमंत्री शंभूराज देसाईंशी संपर्क कोण साधणार, याची साताऱ्याला उत्सुकता आहे. मोठी वैयक्तिक टीका सहन केलेले शंभूराज भाजपशी दोस्ती करणार का? हा खरा प्रश्न आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमधील शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शक्य असेल तिथे युती करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार पालकमंत्री या नात्याने शंभूराज देसाई यांनी महायुतीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, भाजपकडून त्यांना कोणताही प्रतिसाद न देता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे पालकमंत्री देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपकडून शंभूराज देसाई यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यांच्या मतदारसंघात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, वनमंत्री गणेश नाईक, आमदार चित्रा वाघ यांनी सभा घेत शंभूराज देसाईंवर टीकास्त्र सोडले होते. त्यांना मालकमंत्री, दादागिरी, गुंडागर्दी अशा शब्दांत त्यांना हिणवलं गेलं होतं. साताऱ्यात ही गत असताना सांगलीत त्यांना भाजपकडून चांगला अनुभव आला नव्हता.
संपर्कमंत्री असलेल्या सांगलीत युतीसाठी त्यांना शंभूराज देसाई यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवले होते, त्यामुळेच निकालानंतर शंभूराज देसाई यांनी आमचा निर्णय करणारा भाजप कोण, असा कडवट सवाल केला होता. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकालच असा लागला आहे की, शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही.
निवडणुकीपूर्व आघाडी करूनही शिवसेना-राष्ट्रवादीने सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. त्यांना भाजपच्या निरोपाची प्रतिक्षा आहे. दुसरीकडे भाजपनेही सातारा जिल्हा परिषदेत आमचाच अध्यक्ष होणार, असे जाहीर केलेले आहे. मात्र, निवडणुकीतील टीकाटिपण्णीमुळे दुखावलेली मने कोण संधाणार, त्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पुढाकार घेणार का? असा प्रश्न आहे.
राष्ट्रवादीची भूमिका काय?
राष्ट्रवादी काँग्रेसने वीस जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपची भूमिका मांडली आहे. शिवसेनेकडून शंभूराज देसाई बोलत आहेत, त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी आम्ही सोबत आहोत, असे वारंवार सांगत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री मकरंद पाटील अथवा खासदार नितीन पाटील कोणीही बोलताना दिसत नाहीत. शिवसेना-भाजपची युती झाली तर राष्ट्रवादीची भूमिका काय असणार, याकडेही जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.