Satej Patil
Satej Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil News: सत्यजित तांबेचं निलंबन आणि भाजप प्रवेशाच्या चर्चांवर सतेज पाटील म्हणाले, ''भाजपची मंडळीच...''

सरकारनामा ब्यूरो

Satej Patil On Satyajeet Tambe News: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आता अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मात्र,तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. तांबे पिता पुत्रांचं पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे.

याचवेळी सत्यजित तांबे हे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजुकीय वर्तुळात सुरु आहे. यावर माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी यावर मोठं विधान केलं आहे.

काँग्रेसचे नेते सतेज पाटील व विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या सत्यजित तांबेंसारखी तुम्हांलाही भाजपकडूनही पाच सहा महिन्यांपूर्वी पक्षप्रवेशाची ऑफर आली होती का? या प्रश्वावर पाटील म्हणाले, भाजपमध्ये येण्याविषयी मला काही ऑफर आली नव्हती. आणि असं काही घडलेलं नाही. पण मला असं वाटतं,या चर्चा कारण नसताना भाजपची मंडळीच पेरत असतात. कारण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी २०-२५ वर्षे दिलेली असतात.पक्ष सोडण्याच्या एखाद्या चर्चेमुळे त्याचं राजकीय कारकीर्द खराब होऊ शकते.

त्यामुळे प्रसारमाध्मांना माझी विनंती आहे की,एखाद्याच्या करिअरबाबत बातम्या देताना विचार करावा. मी १९९२ पासून एनएसयूआयपासून काम करतोय. एनएसयूआयमधून सुरू केलेल्या राजकीय कार्यकालाला आता जूनमध्ये ३० वर्षे होतील असेही सतेज पाटील (Satej Patil) यांनी यावेळी सांगितले.

..तर आम्हीही गोकुळवर प्रशासक आणू शकलो असतो!

गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी दोन दिवसांपूर्वीच 'गोकुळ'च्या कारभाराचा भांडाफोड करण्याचा इशारा दिल्यानंतर चौकशीचे आदेश निघाले आहेत. शौमिका महाडिक यांनी चाचणी लेखापरीक्षणाची मागणी केल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

यावर भाष्य करताना पाटील म्हणाले, राज्यात आमच्या सत्तेच्या काळात आम्ही गोकुळवर प्रशासक आणू शकलो असतो. गेल्या अडीच वर्षात राजाराम कारखान्यावर कारवाई करू शकलो असतो. पण आम्ही तसं केलं नाही. ज्यांनी तक्रार केली त्यांचे स्वागतच आहे. पण चौकशीला आम्ही पूर्णपणे सहकार्य करणार आहोत.

मात्र, त्यात गेल्या पंचवीस वर्षाच्या कारभाराच्या देखील चौकशीच्या उल्लेख करायला हवा होता. असा टोलाही गोकुळ दूध संघाच्या चाचणी लेखापरीक्षणावरून सतेज पाटील यांनी शौमिका महाडिकांना लगावला आहे.

मग तांबे यांना डावललं असं कसं म्हणता येईल..

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षानं सत्यजित तांबे यांना डावललं नाही. कोणी उमेदवारी घ्यायची याचा निर्णय तांबे कुटुंबियांनी घ्यायचा होता. पक्षानं कोरा एबी फॉर्म तांबे यांना दिला होता. मग उमेदवारीबाबतचा निर्णय तांबे कुटुबियांनी घ्यायचा होता. मग सत्यजित तांबे यांना डावललं असं कसं म्हणता येईल अशी विचारणा करतानाच वरिष्ठांनी तांबेंच्या बाबतीतला निर्णय घेतला आहे असेही माजी मंत्री व काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी यावेळी सांगितले आहे.

रोज उठून एकमेकांवर टीका करत बसणं योग्य आहे का?

आम्ही पाहतोय, विरोधी पक्षातील खासदार,आमदार, मंत्री दिसल्यावर आम्ही त्यांच्याशी जरासं हसलो,चर्चा केली की पक्षप्रवेशाच्या चर्चा घडविल्या जातात. पण महाराष्ट्राची एक संस्कृती आहे. एकमेकांचा आदर करायला पाहिजे. पण सध्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत एक वेगळंच वातावरण निर्माण केलं जात आहे.

विरोधी नेता आला तर नमस्कारही करायचा नाही का असा सवाल उपस्थित करतानाच राजकीय भूमिकांना विरोध ज्या महाराष्ट्राच्या हिताच्या नाहीत, एखादा चुकीच्या निर्णयाला विरोध हा विधानसभा, विधान परिषदेच्या सभागृहात करणं योग्य आहे. रोज उठून एकमेकांवर टीका करत बसणं हे योग्य आहे का असंही कदम यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT