Satej Patil, Hasan Mushrif News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : मुश्रीफांच्या ऑफरवर स्पष्ट बोलत, सतेज पाटलांनी ठोकला लोकसभेच्या जागेवर दावा

- लुमाकांत नलवडे

Satej Patil News : कोल्हापूरच्या राजकारणात मंत्री हसन मुश्रीफ आणि माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी अनेक संस्था ताब्यात घेतल्या. दोन्ही नेत्यांनी जिल्ह्यातील राजकारणावर पकड निर्माण केली. त्या माध्यमातून जिल्हा बॅंक आणि 'गोकूळ' सारख्या संस्थेवर त्यांनी सत्ता मिळवली. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय समिकरणे बदलली आहेत.

यामुळेचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी पाटील यांना युतीत येण्याची ऑफर दिली होती. मात्र, ही ऑफर असली तरीही मी महाविकास आघाडीतूनच लढणार आहे. लोकसभेसाठीही जिल्ह्यातील एक मतदारसंघ काँग्रेसला द्यावा, अशी आमची मागणी असल्याचेही सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील नागरीक आणि कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आयोजित भेटीगाठी कार्याक्रमानंतर ते पत्रकाराशी बोलत होते.

इतर पक्षांमध्ये फूट पडली असली तरीही काँग्रेस (Congress) राज्यात आणि जिल्ह्यात एक संघ आहे. ती एक संघच राहील, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबईत बैठका सुरू आहेत. मात्र, याचा निर्णय दिल्लीतच होईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक काँग्रेसला द्यावा, अशी ही आमची मागणी आहे.

पाटील यांच्या मागणीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यात आहे. कारण कोल्हापुरातील दोन्ही जागा या शिवसेनेकडे आहेत. येथे शिवसेनेचे (Shivsena) विद्यामान खासदार आहेत. येथील दोन्ही खासदार म्हणजे संजय मंडलीक व हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात गेले आहेत. पाटील यांनी एका जागेवर दावा केला आहे. यामुळे आघाडीमध्ये जागा वाटपावरुन धुसफूर होऊ शकते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार मंत्री झाल्यामुळे मंत्री मंडळ विस्ताराचा तिढा लवकर सुटेल असे वाटत नाही. मंत्री होणार म्हणून गतवर्षी शिवलेली जॅकेट आता अपुरे पडत असल्याचीही टीका करत त्यांनी शिंदे गटातील आमदारांची फिरकी घेतली. देशाचा अमृत महोत्सव सुरू असताना मणिपूर सारखी घटना दडपण्याचा प्रयत्न झाला. दीड महिन्यानंतर इंटरनेट सेवा सुरू झाल्यावर ही घटना सर्व जगासमोर आली. स्थानिक मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा अहवाल केंद्र शासनाला दिला होता का? दिला असला तरीही केंद्र शासन का गप्प बसले होते, केलेले पाप झाकण्याचा प्रयत्न झाल्याची ही टीका आमदार पाटील यांनी केली.

दरम्यान, भागातील नागरी समस्यांसाठी निधी पाहिजे, शाळा-महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जात नाही. या सहअन्य वैयक्तीक समस्या घेवून आज सुमारे पाचशेहून अधिक नागरिकांनी कॉंग्रेस कमिटीत रांग लावली होती. सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंत या सर्वांच्या समस्या आमदार पाटील यांनी जाणून घेतल्या. काहीच्या समस्या सोडविण्यासाठी तेथूनच संबंधित अधिकारी, प्राचार्य यांनाही थेट संपर्क केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनीही त्यांच्या भागातील नागरिक समस्यांबाबत गाऱ्हाणी मांडली. त्या सोडविण्यासाठी आवश्‍यक निधी देण्यासह संबंधित अधिकाऱ्यांना ही सुचना या भेटीगाठी कार्यक्रमातून देण्यात आल्या.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT