Chandrakant Patil
Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर उत्तरसाठी पक्षश्रेष्ठींना दोन नावे कळवली; पण आम्ही या नावावर आग्रही!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur North by-election) महाराष्ट्र भाजपने (bjp) दोन नावे पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवली आहेत. त्यामध्ये माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांच्या नावाचा समावेश आहे. कदम यांच्या नावावर आमचे एकमत झाल्याचे आम्ही दिल्लीला कळविले आहे. पण अंतिम निर्णय अजून झालेला नाही. आज (ता. १८ मार्च) रात्री होणाऱ्या पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीनंतर अधिकृत उमेदवाराची घोषणा होईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले. (Kolhapur North by-election : Satyajit Kadam & Mahesh Jadhav's name sent to central leaders for candidature)

कोल्हापूरमधील पत्रकार परिषदेत आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले की, भाजप हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. त्यानुसार कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतील उमेदवाबाबत प्रथम स्थानिक पातळीवर विचारविनिमय झाला. त्यानंतर माजी खासदार धनंजय महाडिक, विनय कोरे, प्रकाश आवाडे यांच्यासोबत मुंबईत देवेंद्र फडणवीस, माझ्यासोबत बैठक झाली. त्यानुसार पक्षाच्या धोरणानुसार दिल्लीतील केंद्रीय समितीकडे दोन नावे पाठवायची असतात. त्यानुसार आम्ही सत्यजित कदम आणि महेश जाधव अशी दोन नावे पाठवली आहेत. पक्षश्रेष्ठींकडून त्यातील कोणते नाव तुम्हाला हवे आहे, अशी विचारणा होते. कदम यांच्या नावावर महाराष्ट्र भाजपचे एकमत झाल्याचे आम्ही पक्षाच्या केंद्रीय समितीला कळविले आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या उमेदवाराचा निर्णय अद्याप झालेला नाही.

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक ही दुरंगी होईल की तिरंगी, हे सांगण्याइतका मी जाणकार नाही. पण, महाविकास आघाडी सध्या प्रचंड घाबरलेली आहे. ते इतरांना उभे राहू देतील, असे काही वाटत नाही. सर्वांच्या हाता-पाया पडून एकच उमेदवार उभा करतील. आम्हालाही त्यांनी विनंती केली होती कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक बिनविरोध करू. पण, आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक दुरंगी की तिरंगी होणार, याबाबत सांगता येणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

आमदार पाटील म्हणाले की, पोटनिवडणुकीच्या प्रचाराला केंद्रीय नेते येण्याची परंपरा नाही. पण, राज्यातील देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, पंकजा मुंडे प्रचाराला येणार आहेत. त्यामुळे आम्ही ही पोटनिवडणूक जिंकणार आहोत. महाआघाडीच्या कारभावर जनता नाराज आहे. वीज कनेक्शन तोडणी, एसटीचा संप, कायदा व सुव्यवस्था, मराठा समाज आरक्षण आदी प्रश्नांवरून समाजातील विविध घटकांमध्ये नाराजीची भावना आहे. ओबीसी आणि धनगर समाजाचीही सरकारकडून फसवणूक करण्यात येत आहे, त्यावर आम्ही पोटनिवडणुकीत आवाज उठवणार आहोत.

पंढरपूर पॅटर्न राबविणार

पंढरपूर पॅटर्नमध्ये आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोचविण्याचे काम केले होत. राज्यातील भाजपचे बहुतांशी नेते पंधरा-पंधरा दिवस त्या मतदारसंघात ठाण मांडून बसले होते. ते प्रत्येक नागरिकांपर्यत पोचले हेाते. त्या काळात त्यांनी ‘मोदी है तो मुमकीन है’ हे जनतेला पटवून दिले होते, तोच पंढरपूर पॅटर्न आम्ही कोल्हापुरात राबविणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT