Shambhuraj Desai, satyajitsinha Patankar
Shambhuraj Desai, satyajitsinha Patankar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या आशीर्वादानेच शंभूराज देसाईंना मंत्रीपद...

जालिंदर सत्रे

पाटण : राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या कृपाशिर्वादानेच राज्यात महाविकास आघाडी होऊन शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेत राहुन कधी राष्ट्रवादीला खुनवायचे तर कधी काँग्रेसला डोळा मारायचा, भाजपची सत्ता आली की तत्कालिन मुख्यमंत्री आपले मित्र असल्याचा डांगोरा पिटणाऱ्या शंभूराज देसाई यांना राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळेच राज्यमंत्रीपद मिळाले. हिंम्मत असेल तर राष्ट्रवादीच्या मेहरबानीतून मिळालेल्या राज्य मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि मगच राष्ट्रवादीला आव्हान द्यावे, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला आहे.

सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले, राष्ट्रवादीला इशारा देण्याइतपत शंभूराज देसाई मोठे नाहीत किंवा शिवसेना कळण्याइतपत ते सेनेशी कधीही एकनिष्ठ नाहीत. केवळ सध्या सत्तेत वाटा मिळाल्याने त्यांना सेनेचा उसणा कळवळा आहे. हिंमत असती तर जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस व सत्ताधारी पॅनेलमधून त्यांना बाहेर काढूनही ते स्वतःच्या हिंमतीवर निवडून आले असते. जिल्ह्यात स्वतःच्या हिंमतीवर विरोध करत शिवसेनेतून निवडून आलेले संचालक आहेत.

अगदी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाऊन स्वतःच्या विश्वासू समर्थकांना निवडून आणण्याची किमयाही सेना आमदारांनी याच निवडणुकीत दाखवली. मग यांनाच राष्ट्रवादीची गरज का वाटते हे त्यांनी जाहीर करावे. केवळ सत्ता व अर्थकारणाच्या जोरावर आपण वाटेल ते करू शकतो. हा त्यांचा भ्रम बाजूला सारून मतदारांनी त्यांचा बहुमताने दारुण पराभव केला. या पराभवात दोष राष्ट्रवादीचा का तुमचा, असा प्रश्न करून सत्यजितसिंह म्हणाले, आजपर्यंतचा गाड्यांचा कर्णकर्कश्य भोंगा मतदारांनी बंद केला आता राष्ट्रवादीला इशारा देत राजकीय भोंगा वाजवण्याचा खटाटोप कशाला करताय.

यापूर्वी काँग्रेसचे मुख्यमंत्री असले की त्यांच्याशी घरोबा करायचा, राष्ट्रवादीचे आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी न बोलवताही आत्मक्लेशमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा किंवा वेळप्रसंगी सेनेशी गद्दारी करून जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीशी आतल्या हाताने हातमिळवणी करायची. भाजपचा मुख्यमंत्री झाला की मित्रत्वाचे गोडवे गायचे हे कदाचित ते विसरले असतील. पण, जनता विसरलेली नाही. गतवेळी ते सेनेचे आमदार असतानाही स्थानिक जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये शिवसेनेच्या निष्ठावंतांच्या विरोधात सोयीस्करपणे तालुका विकास आघाडी स्थापन करून शिवसैनिकांचा पराभव करणारांनी सेनेचा खोटा कळवळा आणू नये, असा टोलाही सत्यजितसिंह यांनी लगावला.

भविष्यात वेगळे लढण्याच्या धमक्या कोणाला देता ? आम्ही कायमच तुमच्याशी राजकीय दोन हात करायला तयारच आहोत. वेगळं लढल्यावर आम्ही काय करतो याचा ट्रेलर दाखवला आहे. येणाऱ्या काळात राजकीय पिक्चरही दाखवू तेव्हा झालेला पराभव नैतिकदृष्ट्या मान्य करा. राष्ट्रवादीला दोष किंवा इशारा देण्यापेक्षा आत्मचिंतन करावे यातून आपल्यातील निष्ठा, विश्वास, दोष समजतील.

यापुढे राष्ट्रवादीला इशारा द्यायचा असेलच तर त्यांच्याच माध्यमातून मिळालेल्या राज्यमंत्रिपदाचा आधी राजीनामा द्यावा आणि मगच महाविकास आघाडी, आघाडी धर्म किंवा सत्ताधाऱ्यांनी गाफील ठेवल्याच्या वल्गना कराव्यात. तुमच्या इशारा, धमक्यांना आम्ही भिक घालत नाही. यापुढच्या सर्व निवडणुका आम्ही राष्ट्रवादीतूनच लढवू आणि जिंकूही असा विश्वासही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT