Ajit Pawar, Sharad Pawar
Ajit Pawar, Sharad Pawar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोरेगाव, माणच्या पराभवावर शरद पवार, अजित दादांनीही व्यक्त केली खंत...

सरकारनामा ब्युरो

सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलच्या उमेदवारांचा कोरेगाव व माण सोसायटी मतदारसंघात पराभव झाला. राष्ट्रवादीकडे विजय गाठण्याची क्षमता असतानाही पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव झाला. याबाबत खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात या पराभवास कारणीभूत असलेल्यांवर पक्षाकडून कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत.

सातारा जिल्हा बँकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुरवातीपासून गांभीर्याने घेतली होती. त्यानुसार रणनिती ठरवत विरोधी भाजपला पॅनेल बांधून दिले नाही. उलट त्यांचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सर्वसमावेशक सहकार पॅनेलमध्ये सामावून घेत त्यांना बिनविरोध निवडून दिले. त्यामुळे निम्मी निवडणूक बिनविरोध झाली.

उर्वरित दहा जागांपैकी जावळीतून आमदार शशीकांत शिंदेंचा एकामताने पराभव नवख्या राजेंद्र रांजणे यांनी केला. तसे रांजणे हे राष्ट्रवादीचेच असल्याने त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेला शब्द जिल्ह्यातील नेत्यांनी शेवटपर्यंत पाळला नाही. त्यामुळे येथे पराभव पत्करावा लागला. तर सर्वात महत्वाचे म्हणजे कोरेगाव आणि माण तालुक्यातील पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला आहे. कोरेगावात राष्ट्रवादीकडे सर्वाधिक ठराव होते. त्यामुळे उमेदवारी जरी शिवाजीराव महाडिक यांना दिली गेली असली तरी येथे राष्ट्रवादीच्याच गटाने विरोधात काम केल्याचे निकालातून स्पष्ट झाले.

येथून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने संचालक झाले होते. त्यांनाच पुन्हा संधी देण्याऐवजी त्यांचा पत्ता कट करून त्यांच्याऐवजी शिवाजीराव महाडिक यांना उमेदवारी दिली गेली. यातून बऱ्यापैकी नाराजीचा संदेश मतदारांत गेला होता. शिवाजीराव महाडिकांच्या उमेदवारीसाठी नितीन पाटील व आमदार मकरंद पाटील आग्रही राहिले होते. त्यांनी त्यांच्या विजयासाठी प्रयत्न देखील केले. पण, येथील राष्ट्रवादीचे नेते आमदार शशीकांत शिंदे जावळीत अडकून पडल्याने त्यांना कोरेगावात लक्ष घालता आले नाही. परिणामी पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठीचे प्रयत्न अपुरे पडले.

महाडिकांच्या विरोधातील उमेदवार सुनील खत्री यांच्या मागे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी ताकद लावली. त्यामुळे राष्ट्रवादीची मते फुटून दोन्ही उमेदवारांना समसमान मते मिळाली. पण, चिठ्ठीने सुनील खत्री यांना साथ दिल्याने शिवाजीराव महाडिक यांचा निसटता पराभव झाला. पण राष्ट्रवादीकडे ७५ मते होती, तर विरोधी उमेदवारांकडे १८ ते १९ मते होती. पण दोन्ही उमेदवारांना ४५-४५ अशी समान मते मिळाली. त्यामुळे येथे राष्ट्रवादीची मते फुटल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतदारांनी विरोधात काम केल्याच संदेश दोन्ही पवारांपर्यंत गेला आहे.

दुसरीकडे माणमध्ये आमदार जयकुमार गोरेंकडे निर्णायक मते होती. ती मते शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांना मिळणार की मनोजकुमार पोळ यांना मिळणार याची उत्सुकता होती. पण, दोघांनाही ३६-३६ मते मिळाल्याने त्यांच्यातही चिठ्ठी टाकण्यात आली. येथेही चिठ्ठीने शेखर गोरे यांना साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेसला माण-खटाव मतदारसंघात गेल्या तीन पंचवार्षिक आमदार करता आलेला नाही. त्यामुळे जिल्हा बँकेत मनोज पोळ यांना निवडून आणून त्यांच्या मागे ताकत उभी करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे प्रयत्नही अपुरे पडले. कोरेगाव आणि माण सोसायटीची जागा राष्ट्रवादीच्या हातून गेल्याची खंत खुद्द खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT