Prakash Ambedkar, Sharad Pawar, Manoj Jarange Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : "जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पहिला राजकीय बळी शरद पवार..."; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा

Jagdish Patil

Prakash Ambedkar on Sharad Pawar : "मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा पहिला बळी शरद पवार ठरतील", असा मोठा दावा वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.

राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या लढ्याचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता आंबेडकरांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार हे केवळ मराठा नेते झाले आहेत, अशी स्थिती मराठा आंदोलनामुळे निर्माण झाली आहे. आजपर्यंत ते मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंची (Manoj Jarange Patil) मागणी टाळत आले आहेत. मात्र, रत्नागिरीच्या सभेत त्यांनी जरांगेंच्या मागणीला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे जरांगे यांच्या मराठा आंदोलनाचा पवार हे पहिला राजकीय बळी ठरतील, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शिवाय जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवार उभे केले नाहीत, तर ते शरद पवारांच्या (Sharad Pawar) इशाऱ्यावर चालत होते हे स्पष्ट होईल. जरांगे पाटील यांच्या मागणीला पवारांनी पाठिंबा दिल्यामुळे ओबीसी नेते बोलत होते त्याप्रमाणे पवार केवळ मराठ्यांचे नेते आहेत, यावर शिक्कामोर्तब झाल्याचंही आंबेडकर म्हणाले.

ठाकरे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अनुकूल

दरम्यान, ओबीसींचं आरक्षण वाढवून ते मराठ्यांना देण्यासाठी उद्धव ठाकरे देखील अनुकूल असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. "मराठवाड्यात जरांगे-ओबीसी असा उघड लढा आहे. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात लढ्याची तीव्रता शा‍ब्दिक नाही पण मानसिक आहे. विधानसभा निवडणूकीनंतर ओबीसी आरक्षण जाईल अशी त्यांची धारणा झाली आहे.

उद्धव ठाकरे देखील ओबीसींचे आरक्षण वाढवून मराठ्यांना देण्यासाठी अनुकूल आहेत. आता शरद पवार यांनीही जरांगेंच्या भूमिकेला समर्थन दिलं आहे. त्यामुळे आता जरांगेंनी निवडणूक लढवली नाही तर ते पवारांच्याच इशाऱ्यावर चालत आहेत, असं समजू."

तिसर्‍या आघाडीसोबत जाणार नाही

तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला 88 जागा तर उर्वरित दोनशे जागा काँग्रेस व शिवसेनेच्या वाट्याला येतील असं म्हणत आपण तिसर्‍या आघाडीबरोबर जाणार नसल्याचंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं. तसेच लोकसभेवेळी सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना आपण विनाअट पाठिंबा दिला होता, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडून मदतीची आम्हाला अपेक्षा नसल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT